भक्ती परब मनाला अलगद झोका दिला क्षण चाहूल देऊ न गेला, चिंब भिजाया आतुर पाऊस पाहुणा आला.. अशा आशयाच्या कित्येक ओळी, चारोळ्या, कविता, हायकू ते अगदी दीर्घ काव्य समाजमाध्यमांवर फॉरवर्ड होऊ लागले की हल्ली पाऊस सुरू झाला यावर विश्वास बसतो. मग सुरुवातीला काही ओळींना, कवितांना दाद मिळते. मग त्यांची खिल्ली उडवणे सुरू होते. त्यात पावसात बाहेर येणाऱ्या दोन गोष्टी, खेकडे आणि कवी.. किंवा जगात दोन प्रकारचे कवी असतात- बारमाही आणि पावसाळी.. अशा आशयाच्या कित्येक पोस्ट कविमनाच्या हळव्या मनाला वादळ बनून त्रास देतात; पण त्यामुळे काहींची पावसाळी काव्यनगरीतून पीछेहाट होते, तर काही अजूनच आवेशाने आणि तितक्याच प्रामाणिकपणे आपली पावसाळी अक्षरयात्रा सुरू ठेवतात. मे महिन्याच्या सुट्टीने ताजेवाने झालेले तरुण मन महाविद्यालयाच्या प्रवेशप्रक्रियेत गुंतते. तो गुंता सुटला की तोवर पहिल्या पावसाचे आगमन झालेले असते. त्यामुळे त्यांच्यातील उत्स्फूर्त भावनांना कवितेची वाट मिळते. महाविद्यालयाचे सुरुवातीचे तीन महिने तरी पाऊस सोबत असतोच आणि आजूबाजूचे वातावरण लिहिण्यासाठी काही तरी, कुठे तरी व्यक्त होण्यासाठी प्रोत्साहित करत असते. महाविद्यालयातील स्पर्धा, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, विविध ठिकाणी आयोजित केले जाणारे कवितांचे कार्यक्रम, सांस्कृतिक कट्टे, पावसाची थीम घेऊन एखादा निवडक नवोदित कवितांचा कार्यक्रम किंवा कवितासंग्रह येणे अशी काही माध्यमे पावसाळ्यात सुचणाऱ्या काव्यरूपी शब्दांची व्यासपीठे होतात आणि या व्यासपीठांकडे जाणारा मार्ग खडतर वाटला तर समाजमाध्यमे आहेतच. या समाजमाध्यमांवर आधीच नावाजलेल्या, लोकप्रिय, प्रसिद्ध कवींच्या पाऊ स-कवितांना वरचे स्थान मिळालेले असते, पण न डगमगता नवोदित कवी यातूनही सावरत आपले काव्यमन मोकळे करतात. फेसबुकवर ‘पाऊस’ हा शब्द मराठीतून सर्च केल्यावर तर याचीच खात्री पटते की मुले मनापासून व्यक्त होतायेत. आवडेल मलाही पाऊस व्हायला न सांगता तुझ्या भेटीला यायला धुंद होऊन तुझ्यावर बरसायला किंवा तहानलेल्या त्या धरतीलाही आता चिंबचिंब भिजायचं पहिल्या पावसाच्या थेंबांनी एवढं का मग लाजायचं? किंवा तो लिहायचा तेव्हा, दाटायचे तिच्या डोळ्यातले काळे ढग कागदावर.. अशा काही कविता ‘आवडेल मलाही पाऊस व्हायला’सारख्या फेसबुक पेजवर वाचायला मिळतात. अशीच आणखी ५० च्या वर फेसबुक पेजेस आहेत, ज्यावर सुंदर पाऊस ओळी वाचायला मिळतात. अशा कित्येक नवोदित कवींच्या कविता समाजमाध्यमांवर वाचायला मिळतात. याविषयी या कवींचे म्हणणे आहे की, पाऊस पडला की जादू होते जणू काही.. कळत नाही का लिहावेसे वाटते, व्यक्त व्हावेसे वाटते. पावसाचे येणे जसे आभाळाचे मन मोकळे होणे अशीच काहींची प्रतिक्रिया असते या पावसात जन्माला येणाऱ्या कवितांविषयी.. कधी पुढे जाऊ नही लिहिणे सुरू राहते. एका टप्प्यावर थांबते. तो पावसाचा क्षण असा काहीसा असतो की सुचते तेव्हा तसे, असे काही जणांचे मत आहे. निनाद वाघ हा तरुण बँकेत नोकरी करतो आणि आपली लेखनाची आवडही त्यासोबत जपतो. त्याचा कवितांचा ब्लॉगही आहे. ब्लॉगवर कविता पोस्ट केल्यावर तो ती फेसबुकवरही शेअर करतो. त्याने पावसावरच्या कविता लिहिल्या आहेत आणि इतरही विषयांवर कविता लिहिल्या आहेत. तो जेव्हा पावसावरच्या कविता पोस्ट करतो, तेव्हा त्याला समाजमाध्यमांतून चांगला प्रतिसाद मिळतो. तू आमच्याच भावना व्यक्त केल्यास अशी दादही मिळते. त्याला ब्लॉगवरच न थांबता स्वत:चे पुस्तकही प्रकाशित करायचे आहे. त्याने महाविद्यालयात असतानाही काव्यस्पर्धामध्ये भाग घेतला आहे. शैलेश खडतरे हा तरुण ई-बुकच्या माध्यमातून अनेक नवोदित लेखकांशी जोडला गेला आहे. त्याच्याकडे अनेक मुलं अशी येतात ज्यांना त्यांचं पुस्तक ई-बुक स्वरूपात आणायचं असतं. शैलेशने त्यांना लेखनात काही दुरुस्ती सुचवली किंवा बदल करायला सांगितला तर ते तयारही असतात. शैलेशचा भविष्यात पाऊस ही थीम घेऊन कवितांचे ई-बुक करण्याचा विचार आहे. समाजमाध्यमांवर लेखन करणारे अनेक नवोदित त्याच्या नेहमी संपर्कात असतात. त्यामुळे पाऊ स-कवितांच्या पुढे जाऊ न चांगले लेखन करणारे लेखक या माध्यमातून पुढे येतील याबाबतीत त्याला खात्री आहे. ‘पावसाळी कविता’ याविषयी अंधेरी भवन्स महाविद्यालयाच्या विभागप्रमुख नेहा सावंत म्हणाल्या, ‘‘आम्ही मराठी वाङ्मय मंडळामार्फत काव्यस्पर्धा घेतो तेव्हा इतर विषयांपेक्षा ‘पाऊ स’ आणि ‘प्रेम’ या विषयांवर कविता, चारोळी लिहिणारी मुले खूप असतात. अलीकडे साहित्याकडे वळण्याचा कल कमी आहे, पण काही अशी मुलेही आहेत, त्यांना पुढे जाऊ न लेखनात किंवा साहित्यविषयक गोष्टींमध्ये रस असतो. त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो. काही मुले स्वत:हून आमच्याकडे येतात, की मॅडम, आमची कविता जरा सुधारून द्या किंवा हे लिहिले आहे ते बरोबर आहे का.. मग आम्ही त्यांना समजावून सांगतो.’’ गुमसुम गुपचुप आना बारिश पलकें मत छलकाना बारिश पत्ता बूटा जंगल भिगे दामन मत उलझाना बारिश खुश रहते को खुश ही रखना दर्द को भी सहलाना बारिश - खलिश इन्स्टाग्राम या समाजमाध्यमाने चित्रकवितेला हक्काचे स्थान मिळवून दिले आहे. इथे आपल्याला सुचलेल्या पाऊ सओळी त्याला योग्य असे एखादे चित्र घेऊ न त्यावर मांडायच्या आणि त्याची इमेज बनवून इन्स्टावर पोस्ट करायची, असे कित्येक नवकवी करतात. कारण इथे फक्त शब्दांत लिहू शकत नाही, त्यामुळे शब्द आणि चित्रे यांचा मेळ साधून अनेक पाऊ स-कविता कमी शब्दांत इथे मांडल्या जातात. ट्विटर या समाजमाध्यमावर तर ‘लोपामुद्रा’सारखी कवितांना वाहिलेली ट्विटर हँडल आहेत. तिथे रोज छान, कधी सुमार कविता वाचायला मिळतात; पण ट्विटरवरची मंडळी पाऊस हा हॅशटॅग वापरून भरभरून व्यक्त होताना दिसतात. इतर अन्य हॅशटॅगमध्येही पाऊस हा अतिशय लोकप्रिय हॅशटॅग आहे. हा हॅशटॅग वापरून पाऊ स-कविता लिहिणाऱ्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणात आहे. यांना ट्विटर संमेलन किंवा ट्विटरवरील इतर काही साहित्यिक उपक्रमांमध्ये व्यक्त व्हायची संधी मिळते. कवी तुषार जोशी ट्विटरवर मराठी मंडळींना परिचित असे कवी आहेत. ते व्यवसायाने सॉफ्टवेअर आर्किटेक्ट आहेत आणि तुष्की नागपुरी या टोपणनावाने कविता लिहितात. त्यांची वेबसाइटही आहे. त्यामुळे अशी काही उदाहरणे पाहता पाऊ स-कविता किंवा पाऊ स असा हॅशटॅग वापरून कविता पोस्ट करण्यापलीकडेही अनेकांचा कल दिसून येतो आहे. समाजमाध्यमांचा वापर वाढल्याने आणि त्यातही स्पर्धा वाढल्याने इन्स्टाग्राम, फेसबुक, ब्लॉग, व्हॉट्सअप, ट्विटर यापलीकडे जाऊन काहींनी आपल्या आवडत्या पाऊ स-कवितांना यूटय़ूबच्या माध्यमातून मोकळी वाट करून दिली आहे. इथे पाऊ स-कविता लिहिण्याच्या किडय़ाबरोबरच त्यांना सादरीकरण कसे असायला हवे याचाही विचार करावा लागतो. आज धुतलेस तू चेहरे पावसा.. लोक दिसलेत सारे खरे पावसा.. - अमित तुझे आगमन प्रत्येकाला हवेच असते पावसा बरस ना आम्हाला तुझी आठवण येते. - दीपक राजेंद्र पाटील. (पहिला पाऊ स पहिला थेंब फेसबुक पेज) पण तरीही ‘पावसाळी कविता’ या प्रकरणाला काही नेटकरी दचकूनच असतात आणि तिखट, कडक प्रतिक्रियाही व्यक्त करतात. ‘स्वयंघोषित कवी-लेखकांची भीती वाटते राव, एक वेळ चारोळीवाले खासदार परडवले..’, अशाही पोस्ट इथे पाहायला मिळतात. अशा कित्येक तिखट आणि टोकाच्या प्रतिक्रिया आल्या तरी लिहिता हात थांबणार नाही. ते त्या क्षणी व्यक्त होताना कुणाची वाट पाहणार नाहीत. हाँ.. पावसाची वाट पाहतील, कारण तो आलाच पाहिजे, जसा कवितेचा येतो. एकूणच कवितांचा पाऊ स अनुभवण्यासारखा आहे. गंमत म्हणून पाऊ स हा शब्द सर्चला टाकून बघा.. आणि मोठी गंमत म्हणजे ‘पाऊ स’ हा शब्द सर्चला टाकल्यावर त्या जोडीने ‘कविता’ हा शब्द पहिला येतो. सर्च करून तर बघा.. कारण कवितांच्या पावसात भिजल्यावाचून आता कुणाचीच सुटका नाही!