भारतीय संस्कृतीमध्ये सणाला फार महत्त्व आहे. विशेषत: स्त्रियांना हे सण फार आवडतात. वर्षांनुवष्रे पुरुषी मानसिकतेचा वरचष्मा असलेल्या या समाजात निदान सणांच्या निमित्ताने स्त्रियांना मोकळीक मिळते. नटायला, घराबाहेर पडायला, हक्क गाजवायला आणि आनंदी व्हायला कारण मिळतं. ‘इतर वेळी माझं काहीच ऐकत नाही पण निदान आज तरी ऐका’, हा राग सणांच्या दिवशी मोठय़ा रुबाबात आळवला जातो आणि पुरुषही त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करतात. नवरा दिवसरात्र मारझोड करणारा, बाहेरख्याली, बेरोजगार, घरात कसलीही मदत न करणारा, कमी शिकलेला, दिसायला कुरूप, संशयी, व्यसनी कसाही असला तरी एकदा लग्नगाठ बांधली की त्याची पूजा करणं आणि पुढील सात जन्म तोच नवरा मिळू दे म्हणून देवाकडे साकडं घालण्याचं काम भारतातील महिलावर्ग मोठय़ा श्रद्धेनं करत असतो. अर्थात सर्वच नवरे वाईट असतात असं नाही. परंतु देशातील स्त्रियांवर होणारा अन्याय, अत्याचार आणि अनेक जबाबदार (?) पुरुषांकडून स्त्रियांचे पोशाख, राहणीमान, भाषा यांबाबत केली जाणारी वक्तव्य पाहता समानतेच्या पातळीवर आपण कुठे आहोत याचा अंदाज सहजपणे बांधता येईल. विशिष्ट ऋतू किंवा काळातच सण का साजरे केले जातात याची वैज्ञानिक कारणं सर्वच सणांच्या बाबतीत सिद्ध झालेली आहेत. पण विज्ञान या विषयाचा शोध जणू काही अलीकडेच लागलेला आहे आणि आपली संस्कृती, प्रथा कशा नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे याचं भांडवल केलं जातं. त्यामुळे परंपरा जपण्याच्या नादात ताíकक विचार करणं मागे पडतं. ही सर्व पाश्र्वभूमी देण्यामागचं कारण म्हणजे मागच्याच आठवडय़ात पार पडलेला वटपौर्णिमेचा सण. गेल्या चार-पाच वर्षांमध्ये अन्न, वस्त्र आणि निवारासोबत मूलभूत गरज बनलेला सोशल मीडिया या सणांच्या दिवशी मोलाची कामगिरी बजावू लागला आहे. एकमेकांपासून दूर गेलेला माणून निदान या सोशल मीडियाने सर्वकाही आलबेल चाललंय असं वाटणाऱ्या आभासी जगतात तरी जवळ आणला आहे. कुठलाही सण जवळ येतो आहे म्हटल्यावर आपणच कशा सर्वात आधी शुभेच्छा देत आहोत, त्या वेगळ्या कशा आहेत, सणाचं महत्त्व सांगणारी प्रबंध लिहिल्यासारखी माहिती, फोटो, व्हिडीओ असं बरंच काही या सोशल मीडियावर फिरू लागतं. वटपौर्णिमेच्या निमित्ताने पुन्हा हे पाहायला मिळालं. व्हॉट्सअॅप हे त्यातील सर्वात प्रभावी व्यासपीठ. आता वटपौर्णिमेचा सण पारंपरिक कथांमध्ये सांगितलाय म्हणून साजरा करायचा की वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून, हा खरंतर लग्न झालेल्या स्त्रिया आणि त्यांच्या पती परमेश्वरांचा प्रश्न. पण आम्ही बापुडे अद्याप सावित्रीच्या शोधात असतानाही आमच्या मोबाइलमधील स्पेस या मेसेजेस, फोटो आणि व्हिडीओने भरून गेली. कारण पन्नास वेगवेगळ्या ग्रुपचे आम्ही सभासद आहोत. तिथे स्त्री-पुरुष, अविवाहित-विवाहित, नाना तऱ्हेच्या विचारांची मंडळी आहेत. त्यामुळे ग्रुपच्या िभतीवर जे काही येऊन आदळतंय त्यावर निदान नजर टाकणं भाग पडतं. यातील अनेक गोष्टी आपल्याला पटत नसल्या तरी लोक काय काय पद्धतीने विचार करतात हे वाचणं आणि पाहणं सामान्यज्ञानात भर घालणारं असतं. आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे आणि सातही जन्म हाच पती मिळावा यासाठी हे व्रत केलं जातं. हे पुराणकथा, संस्कृती, धर्माचे दाखले देऊन समजावण्याचा प्रयत्न केला जात होता. यातील आरोग्य आणि दीर्घायुष्य या दोन गोष्टी मान्य, पण पुढच्या जन्मीसुद्धा हाच पती मिळावा यावरून सुरस कथा आणि विनोदांचं पेव फुटलेलं. सत्यवान-सावित्रीच्या कथेमध्ये काहीही दम नसून सात जन्माचे रहस्य काय आहे याची जीवशास्त्रीय भूमिका मांडणारी पोस्ट सर्वत्र फिरत होती. यामध्ये पुढच्या जन्माचा काहीही संबंध नसल्याचं सविस्तरपणे स्पष्ट केलं होतं. तर दुसरीकडे वड ही कशी उपयुक्त वनस्पती आहे याचं महत्त्व सांगितलं होतं. लहान-मोठय़ा पक्षांचं निवासस्थान आणि अन्न उपलब्ध करून देणारे झाड पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये कशी मदत करतं हे समजावून सांगितलं होतं. त्यामुळे झाडाच्या फांद्या तोडू नका. झाडापाशी जाऊनच पूजा करा किंवा आपल्या दारी वडाच्या झाडाची लागवड करा असे सल्लेही मिळत होते. संदेशांसोबतच विनोदी फोटोंचादेखील भरणा होता. झाडाची फांदी कोणी तोडू नये म्हणून एका फोटोमध्ये तर वडाच्या झाडावर लावलेल्या पाटीवर ‘फांदी तोडणाऱ्या बाईचा नवरा मरेल’, असं लिहिलं होतं. आणखीन एका फोटोत तर दोरे गुंडाळलेल्या वडाच्या झाडाला आग लागलेली होती. बायका जिथे जातात तिथे आपलं काम चोख करतात हा मेसेज त्यासोबत फिरत होता. एकूणच सण महत्त्वाचे की पर्यावरण यामध्ये सोशल मीडियावरील फॉरवर्डच्या खेळात जोरदार जुगलबंदी सुरू होती. विकास कामांसाठी होणारी वृक्षांची कत्तल हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. त्याकडे वेगळ्या नजरेतून पाहून कृती करायला हवी. सणांमुळे वृक्षसंपदा वाचण्यास मदत होत असेल तर अशा सणांना अधिकाधिक प्रोत्साहनच दिलं पाहिजे, असं ठाम मत अनेक जण मांडतात. पण बुरसटलेल्या विचारसरणीला छेद देऊन आपण आपली बौद्धिक पातळी कधी उंचावणार हा प्रश्न उरतोच. ज्या गोष्टी शास्त्रशुद्धरीत्या सिद्ध झाल्या आहेत, निदान त्याकडे तरी आपण तशाच पद्धतीने पाहायला नको का? वातावरणात फिरणारा हा चुकीच्या गोष्टींचा कचरा फॉरवर्ड न करता आपणच नष्ट करायला हवा. राष्ट्रीय झाडाचा दर्जा असलेलं वडाचं झाड फक्त वटपौर्णिमेसाठी नाही तर अनेक कारणांसाठी वाचवणं गरजेचं आहे. नाही तर पुढील सहा जन्म वडाच्या झाडाचा फोटोच पुजावा लागेल. viva@expressindia.com