हिमांग्शी दांगले

तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

आपल्या आयुष्यात स्वातंत्र्य महत्त्वाचे असते. स्वतंत्र व्यक्ती असण्याची आपली धडपड सुरूच असते, पण काहींच्या बाबतीत एकटेपणा ठासून भरलेला असतो. आणि ती दुसरी-तिसरी कोणी नसून आजची तरुण पिढीच आहे. मौलाना रूमी हा जरी एक कवी व लेखक असला तरी राजकीय तत्त्वज्ञानाची त्याला मस्त जाण आहे. त्यामुळे त्याच्या ‘द फॉर्टी रुल्स ऑफ लाइफ’ या पुस्तकातील ही एक ओळ मला जास्त आवडते. याचा लेखक इलिफ शाफक हा आहे, त्याने या कादंबरीची पुनर्माडणी केली आहे. त्याची कादंबरी लिहिण्याची पद्धत एका महत्त्वाच्या विषयाला स्पर्श करते. आज तरुण पिढी देशासाठी किती एकत्र आली पाहिजे, पण वास्तविक ती अतिशय दुबळी झाली आहे, आणि हे एक कटू सत्य आहे. लेखकाने धीटपणा, कर्तव्य व मेहनत या त्रिकुटाची गंमत व तत्त्वज्ञान एका मजबूत व्यक्तीसाठी किती महत्त्वाचं आहे, पुढे गेल्यावर एका कुटुंबांसाठी आणि मग राष्ट्रासाठी ते कसं योग्य होत जातं हे कादंबरीतून मांडलं आहे. या एका ओळीतून मला आपल्या आजच्या तरुण पिढीची स्थिती लक्षात येते. तरुणांची एकजूट खूप महत्त्वाची असते. मात्र आज चित्र असे आहे की सगळे आपापल्या आयुष्यात व्यग्र आहेत. सतत मोबाइलवर असणारी तरुण पिढी हे भयाण वास्तव आहे, हेच या ओळीतून लेखकाला दर्शवायचे आहे. तरुण पिढी ही खूप ‘सेल्फ सेंट्रिक’ झालीय. त्यांच्याजवळ दुसऱ्यांसाठी वेळ नाही. एकजुटीचं तत्त्वज्ञान सांगत कम्युनिटीला एकत्र आणण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणीची ही कथा म्हणूनच महत्त्वाची ठरते.