बाळ जन्माला आल्यापासूनच अक्षरओळख, भाषाओळख करून द्यायला सुरुवात होते. हळूहळू आई-बाबा असे शब्द बोलत, नंतर शाळेत क ख ग घ शिकत शिकत आपण सगळे मोठे होतो आणि अक्षरं आपल्या अंगवळणी पडतात. अक्षरं लिहिण्याच्या बऱ्याच पद्धती अनेक वर्षांपासून चालत आल्या आहेत. प्राचीन भारतात भूर्जपत्रावर आणि ताम्रपत्रांवर भाषा लिपीबद्ध व्हायला सुरुवात झाली. पाम वृक्षाच्या पानांचा वापरही लिखाणासाठी होत असे. कागदाचा पर्याय उपलब्ध झाल्यावरसुद्धा या पानांचा वापर होत असे. कारण याच्या पटलावर नाजूक आणि अलंकारिक अक्षरं लिहिता येत असत, ज्याला आज आपण कॅलिग्राफी असं म्हणतो. भाषा लिपीबद्ध झाली आणि दळणवळणाचं एक आवर्तन पूर्ण झालं. लिपींचा वापर दळणवळणापेक्षा आणखी वेगळ्या स्तरावर होऊ शकतो हे माणसाच्या लक्षात आलं आणि कॅलिग्राफी हा कलाप्रकार जन्माला आला. या अक्षर सुलेखनाने आशय आणि सौंदर्य हे एकाच वेळी इतक्या प्रभावीपणे पोहोचत होते की धार्मिक ग्रंथ, इतिहासलेखन आणि पत्रे यानंतर अनेक प्रकारच्या कारागिरीमध्ये सुलेखनाचा वापर होणे स्वाभाविकच वाटते. सुलेखनाच्या वापरामुळे विविध प्रकारच्या हस्तकलांना सौंदर्यासोबतच एक वेगळे परिमाण प्राप्त झाले. सुलेखनकार आणि कसबी कारागीर यांच्यात एक प्रकारचे आंतरिक साम्य आहे. यांना आपल्या रचनांमधून व्यक्त होताना आलंकरण महत्त्वाचे वाटते. दोघांनाही कसबी हात आणि चिंतनाची बैठक असलेला विचार यांची गरज असते. दोघांनाही प्रचंड सराव आणि शिस्त असावी लागते. त्यांना आपली रचना आणि तिची चौकट यांची आखणी करावी लागते. या दोन्हीचा मिलाफ होऊन वस्त्रकलेमध्येही सुंदर परंपरा निर्माण झाल्या. वस्त्रपरंपरेमध्येही सुलेखन आले, काही अर्थ, आशय घेऊन त्याचा वापर झाला, पण इतर कलांप्रमाणेच पुढे जाऊ न त्या शब्दांनी अर्थाच्या मर्यादा ओलांडल्या आणि निखळ सौंदर्य या कला निकषावर उतरल्या. सुलेखनाचा वापर वस्त्रपरंपरेमध्ये एक रचनाघटक म्हणून होऊ लागला. भारतीय वस्त्रपरंपरांमध्ये हातमाग विणकामासहित ब्लॉक प्रिंटिंग, कशिदाकारी, इकत आदी विविध प्रकारांमध्ये सुलेखनाचा वापर होऊ लागला. नेसण्याच्या वस्त्रांव्यतिरिक्त थालपोश, मेजपोश, मुस्लीम मेजवान्यांसाठी लागणारे दस्तरखान यामध्येही धार्मिक कवने, इतर काव्यं अवतरली. देवांची नावं हातमागावर विणण्याची एक संपन्न परंपराच निर्माण झाली, ही ‘नामावली’ या नावाने प्रसिद्ध झाली. आसाममध्ये घरगुती हातमाग सर्वात जास्त संख्येने आहेत असे मानले जाते. तिथे अतिथीचा सन्मान करण्याची एक खास परंपरा आहे. पाहुण्यांना एक हातमागावर विणलेला पंचा किंवा गमछा सादर केला जातो. ही परंपरा आजही जपली जाते. या लाल आणि पांढऱ्या रंगाच्या पंचावर आसामी भाषेत विशिष्ट रचनेत विणले जाते. भारताच्या आध्यात्मिक राजधानीमध्ये ही ‘नामावली’ची परंपरा निर्माण झाली. बंगालमध्ये ही खूप लोकप्रिय होती. बनारसच्या विणकरांनी खास राजपरिवारातील स्त्रियांना सादर करण्यासाठी ‘बाई साहिब कुंवर बाई साहिब’ अशी देवनागरी अक्षरे असलेली सुरेख साडी बनवली होती. राजे- महाराजे यांचे नाव विणलेल्या साडय़ांचीही परंपरा होती. धाग्यांवर इकत (टाय डाय) पद्धतीने रचना करण्याचे अतिशय किचकट तंत्र असते. ओडिशातील नौपटना हे गाव या इकत पद्धतीने सुलेखन करण्यात माहीर आहे. जगन्नाथाच्या पूजेशी संबंधित ही परंपरा आहे. जयदेवाच्या गीतगोविंदमधील रचना आणि कवींच्याही रचना इथे साडय़ांवर आणि शालींवर अंकित केल्या जातात. मध्य प्रदेशातील चंदेरी येथील साडय़ांची परंपरा अंदाजे सातव्या शतकापासून चालत आली आहे. तेथे नवरीला लग्नात देण्यासाठी एक खास साडी बनवली जायची. या साडीच्या दोन्ही काठांवर ‘सदा सौभाग्यवती’ असे आशीर्वादपर वचन विणलेले असायचे. कालौघात ही परंपरा लुप्त झाली. काही दशकांपूर्वी तिथल्या विणकरांनी ‘वेलकम’ अशी अक्षरे साडीवर विणली आणि साहजिकपणे शहरी किंवा पारंपरिक ग्राहकांना आकर्षित करू न शकल्याने हे कौशल्य लयास गेले. हातमागाबरोबर अनेक प्रकारच्या कशिदाकारीमध्येही सुलेखन केले जात होते. पारंपरिक कारागिरीतील हे कौशल्य जपण्यासाठी काही डिझायनर प्रयत्न करीत आहेत. सर्वानीच अशा वारशाबद्दल जागरूक राहणे या कला टिकण्यासाठी गरजेचे आहे. viva@expressindia.com