विनय नारकर गुगलने ३ एप्रिलला कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या ११५ व्या जयंती निमित्त डूडल प्रसारित केले. गुगल हा सन्मान सहजी कोणाला देत नाही. बऱ्याच लोकांना प्रश्न पडला, ‘या कोण.?’ कमलादेवींचं स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाव्यतिरिक्त हस्तकला, हातमाग, कला आणि संस्कृती यामधील योगदान प्रचंड आहे. त्यांना भारताची ‘कल्चर क्वीन’ असेही संबोधले गेले आहे. एकदा कमलादेवींनी हैदराबादमध्ये चारमिनारच्या मागे एके ठिकाणी ‘तेलिया रुमाल’ पाहिला. त्यांनी त्याबद्दल चौकशी केली. त्यांना सांगण्यात आलं की हे पोचमपल्लीमध्ये विणले जातात. तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची काही मित्रमंडळी आणि उद्योग विभागातील काही अधिकारी होते. मे महिना होता. कमलादेवी म्हणाल्या,‘लगेच पोचमपल्लीला जाऊ या’. अधिकारी नाराजीनेच तयार झाले. जीपमधून जायचे होते. रस्ता बैलगाडीचा होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या निवडुंगांना चुकवीत असताना कमलादेवींच्या हातातून रक्त येऊ लागले. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी गांधीजींच्या उपायाप्रमाणे डोक्यावर ओला पंचा त्यांनी ठेवला होता. काही तासांनी ते पोचमपल्ली या छोटय़ा गावात पोहोचले. विणकरांना त्यांनी बोलावून घेतले. विणकरांनी त्यांची व्यथा सांगितली की मिळणाऱ्या मोबदल्यात भागत नाही आणि नियमित विक्रीही होत नाही. कमलादेवींनी त्यांना साडय़ा बनवण्याचा सल्ला दिला. त्यायोगे त्यांना चांगला मोबदला मिळेल व नियमित विक्री होईल, असे सांगितले. विणकरांनी त्यांच्या मर्यादा आणि अडथळे सांगितले. कमलादेवींनी लगोलग सांगितले की याचा सर्व खर्च त्या करतील आणि दुप्पट मोबदलाही देतील. एका महिन्यात तीन साडय़ा तयार झाल्या. त्यांच्या पुढाकाराने भारत सरकारने सुरू केलेल्या ‘सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज् एम्पोरियमने’ साडय़ांची पहिली मागणी नोंदवली. कमलादेवींनी त्यांचा मोबदला त्वरित देण्याची व्यवस्था केली. अशा प्रकारे नियमितपणे पोचमपल्ली साडय़ा बनू लागल्या. काही दिवसांत चादरी आणि तागे बनण्यास सुरुवात झाली. दोन विणकरांना रेशमी साडय़ा विणण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी बनारसला पाठवण्यात आले. रेशमी इकत साडी अस्तित्वात आली. आता फक्त पोचमपल्ली गावच नाही तर पूर्ण नालगोंडा जिल्'ाातील विणकर समृद्ध झाले. आज आपण पोचमपल्ली साडीचे वैभव पाहत आहोतच. मंगलोरमधील सारस्वत चितारपूर ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या कमलादेवींना सधन आणि सांस्कृतिकदृष्टय़ा संपन्न बालपण मिळाले. परंतु, वडिलांच्या अकाली जाण्याने संघर्षही बराच करावा लागला. बालपणीच विवाह करावा लागला आणि एकाच वर्षांत वैधव्यही आले. त्यांचे पती सत्याग्रही होते. कमलादेवींच्या मामांमुळे त्यांना गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे व रमाबाई रानडे यांच्याशी त्यांचा संपर्क आला. त्यांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांच्या आईंनी प्रोत्साहन देऊन शिक्षणासाठी त्यांना मद्रासला नेले. उत्तम शिक्षण घेत असतानाच त्यांची सरोजिनी नायडू व त्यांच्या बहिणीशी छान मैत्री झाली. त्यांच्या मोकळ्या व पुरोगामी स्वभावामुळे कमलादेवींचा स्वभावही खुलला. गांधीविचाराकडे त्या ओढल्या गेल्या. सरोजिनी नायडूंच्या भावाशी, कवी हिरद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याशी कमलादेवींनी विवाह केला. ‘इनर रेसेस् आउटर स्पेसेस् - मेमोयर्स’ या आपल्या आत्मचरित्रात त्या म्हणतात, ‘गांधीजींना भेटल्यावरच मला हस्तकला आणि दैनंदिन जीवन यांच्यातील अन्योन्य संबंधाची जाणीव झाली.’ कमलादेवींनी हस्तकलेला रोजच्या जीवनातील सर्जनशील अभिव्यक्ती मानले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हातमाग, अन्य हस्तकला व विविध कलाप्रकारांचे पुनरुज्जीवन करून आपल्या लोकांचे आयुष्य समृद्ध करणे हेच ध्येय त्यांनी आपल्यासमोर ठेवले. ब्रिटिश सरकारने भारतीय हातमाग व अन्य हस्तकलांचे पद्धतशीर खच्चीकरण केले होते. या क्षेत्रांच्या पुनरुज्जीवन आणि विकासासाठी कोणतेही उदाहरण समोर नव्हते. कमलादेवींनी सर्व हातमाग व हस्तकला केंद्रांची माहिती जमा करण्यापासून काम सुरू केले. सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना त्या स्वत: भेटी देत. प्रत्येक ठिकाणचा अभ्यास करून त्या त्या उत्पादनासाठी काय करता येईल हे ठरवणे, गरज असेल तिथे डिजायनर्सची मदत घेणे, अशा प्रकारे हे काम त्यांनी सुरू केले. या सर्व गोष्टींसाठी त्यांच्या पुढाकाराने ‘ऑल इंडिया हॅण्डिक्राफ्ट अॅण्ड हॅण्डलूम बोर्ड’, ‘सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज् एम्पोरियम’, ‘क्राफ्ट कौन्सिल ऑफ इंडिया’ या व अन्य संस्था सुरू केल्या. या अंतर्गत फक्त उत्पादन करून भागणार नव्हते, म्हणून त्यांच्या विक्रीसाठी एम्पोरियम्स बनवली, प्रदर्शने सुरू केली. आज आपण हातमाग किंवा हस्तकलेच्या वस्तू सहज दुकानातून घेऊ शकतो. १९६० पर्यंत अशी कोणतीही सुविधा नव्हती. पोचमपल्ली हे एक उदाहरण झाले. त्याप्रमाणेच ‘कालहस्तीची कलमकारी’ ही कपडय़ावर नैसर्गिक रंगांनी चित्र काढण्याची कलाही कमलादेवींच्या हस्तक्षेपाशिवाय लुप्त झाली असती. आधुनिक भरतनाटय़मच्या जननी श्रीमती रुक्मिणीदेवी यांच्या मदतीने त्यांनी कांजीवरम साडय़ांचे आणि नैसर्गिक रंग बनवण्याच्या पद्धतीचे पुनरुज्जीवन केले. हेच नाही तर अनेक ठिकाणची भांडी, शिल्पकला, कशिदाकारी, फर्निचर, दागिने या गोष्टींच्या संवर्धनाचेही काम कमलादेवींनी केले आहे. आणि म्हणूनच प्रत्येक सौंदर्यप्रेमी भारतीयाने त्यांचे स्मरण ठेवले पाहिजे. viva@expressindia.com