पहिला पाऊस.प्रत्येकाचा पहिला पाऊस हा वेगळा असतो. काही तरुण मंडळी पहिल्या पावसात भिजून कल्ला करायचा प्लॅन करतात तर काही जण पहिल्या पावसाच्या संततधारेकडे एखाद्या शेडखाली उभं राहून पाहणं पसंत करतात. काही हौशी कांदा-भजी आणि चहा असा बेत करतात तर काही शौकीन पावसाच्या बॅकग्राउंड म्युझिकवर आवडलेलं एखादं सुरेख पुस्तक वाचत कॉफीचा भुरका घेतात. प्रत्येकाची पावसाचा आनंद घेण्याची पद्धत निरनिराळी असते. कुणाला आत राहून मन भिजवायला आवडतं तर कुणाला बाहेर जाऊन प्रत्यक्ष भिजायला.. हा सगळा आनंद घेताना आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं आहे. अन्यना आजारांना आयते आमंत्रण होऊ शकते.. जाणून घेऊयात पावसात भिजल्यानंतर काय काळजी घ्यावी.. कपडे बदला - तुम्ही पावसात भिजले असाल तर घरी आल्यानंतर तात्काळ कपडे बदला. कारण भिजलेल्या कापड्यामुळे थंडी वाजून ताप किंवा सर्दी होण्याची शक्यता आहे. तात्काळ कपडे बदलल्यास थंडी वाजणार नाही. केस कोरडे करा - मनमुराद पावसात भिजले असाल तर घरी आल्यानंतर केस कोरडे करायला विसरू नका. शक्य झाल्यास पावसातून भिजून आल्यानंतर कोमट पाण्याने अंघोळ करा आणि केस कोरडे करा. पावसात केस भिजल्यामुळे डोक दुखू शकते. गरम जेवण करा - पावसाळ्यात गरमा-गरम जेवणाला प्राधान्य द्या. शक्य असल्यास पिण्याचे पाणीही उकळून प्या. पावसाळ्यात खाण्याची आणि पाणी पिण्याची विशेष काळजी घ्या. फास्ट फूडला राम राम करा - पावसाळ्यात अनेकांना पास्ट फूड किंवा गरमा गरम भजी खायची इच्छा होती. मात्र, मोह टाळून फास्ट फूड किंवा तळलेले पदार्थ खाणं टाळावे. अशा पदार्थांमुळे तुम्हाला पोटाची समस्या होऊ शकते. व्यायाम करा - पावसाळ्यात सर्वांनी दररोज थोडाफार व्यायाम करायला हवा. व्यायाम केल्यामुळे तुम्ही तंदुरूस्त राहाल शिवाय रोग प्रतिकारकशक्तीही वाढेल.