रिलायन्स जिओ जेव्हापासून बाजारात दाखल झाले आहे तेव्हापासून कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. एकमेकांना टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपन्या एकाहून एक आकर्षक असे प्लॅन जाहीर करत आहेत. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपन्या प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रयत्न एअरटेलने केला असून एक खास अशी कॅशबॅक ऑफर कंपनीने जाहीर केली आहे. ही ऑफर प्रीपेड ग्राहकांसाठी असून ३९९ रुपयांचे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना तब्बल ४०० रुपयांची कॅशबॅक मिळणार आहे.

या ऑफरसाठी कंपनीने एक अट ठेवली आहे. ती म्हणजे दरवेळी ३९९ रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना ५० रुपयांचे व्हाऊचर मिळणार आहे. असे ८ वेळा ३९९ रुपयांचे रिचार्ज केल्यास दरवेळी हे ५० रुपयांचे व्हाऊचर कंपनी देणार आहे. म्हणजे ग्राहकांना हा प्लॅन ३९९ ऐवजी ३४९ रुपयांना पडणार आहे. मात्र यासाठी ग्राहकांना ८ वेळा जवळपास ४०० रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. ही ऑफर ३१ मार्च २०१० पर्यंत सुरु राहणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

याआधीही सप्टेंबरमध्ये कंपनीने ३९९ रुपयांच्या प्लॅनवर ३०० रुपयांची सूट दिली होती. तेव्हाही ६ महिने ५० रुपयांचे रिचार्ज देण्यात आले होते. तर मागील वर्षी याच प्लॅनवर कंपनीने १०० टक्के कॅशबॅक दिली होती. या ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ७० दिवसांची व्हॅलिडीटी मिळत असून दर दिवसाला २.४ जीबी डेटा मिळत आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० मोफत मेसेजही मिळणार आहेत.