जसे जसे वय वाढत जाते, तसे तसे आपले शरीर कमजोर होत जाते. वृद्धत्वात तर स्नायू व मांसपेशी कमकुवत झालेल्या असतात आणि अशक्तपणा आलेला असतो. पण जर सफरचंद आणि हिरव्या टोमॅटोंचे नियमित सेवन केले तर वृद्धपणी होणाऱ्या विकारांवर तुम्ही मात करू शकता. या फळांच्या सेवनाने शरीर बळकट राहते आणि वय वाढले तरी शरीर कमजोर होत नाही, असा दावा अमेरिकेतील संशोधकांनी केला आहे. लोवा विद्यापीठाच्या या संशोधकांनी ‘वृद्धत्व आणि आजार’ यासंदर्भात संशोधन केले. वाढत्या वयाबरोबर शारीरिक बळ आणि स्नायूंचा क्षय होतो. याचे मुख्य कारण शरीरात असलेले ‘एटीएफ४’ नावाचे प्रथिन. या प्रथिनांचा अतिरेक शरीरासाठी अनावश्यक असतो. ‘एटीएफ४’मुळे स्नायूंमधील प्रथिनांचे संकलन, शारीरिक बळ आणि स्नायूंचे आकारमान कमी करत असतो. वृद्धत्वात ‘एटीएफ४’मुळेच शरीर कमजोर बनते, असे या शास्त्रज्ञांनी सांगितले. ‘एटीएफ४’चे कार्य कमी करण्याची क्षमता दोनच फळांमध्ये आहे. एक सफरचंद आणि दुसरे हिरवे टोमॅटो. ही फळे नियमित खाल्ल्यास स्नायू बळकट राहतात आणि वृद्धपणीही शरीर कमजोर होण्याचा धोका कमी असतो, अशीोमहिती ख्रिस्तोपर अॅडम्स यांनी दिली. अॅडम्स हे लोवा विद्यापीठात औषधशास्त्र विभागात प्राध्यापक आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन सुरू आहे. सफरचंदाच्या सालीमध्ये उरसोलिक आम्ल असते, त्याचबरोबर हिरव्या टोमॅटोमध्ये टोमॅटिडाइन असते. स्नायूंचा क्षय होण्यापासून रोखण्यासाठी त्यांची मदत होते. त्यामुळे सफरचंद आणि हिरवे टोमॅटो यांचे सेवन करणे गरजेचे आहे. वृद्धपणी येणारा शारीरिक कमकुवतपणा आणि स्नायूंचा क्षय टाळण्यासाठी त्यांची आवश्यकता आहे. - ख्रिस्तोपर अॅडम्स, संशोधक.