शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपल्या आहारात चांगल्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. आहार चांगला असेल तर आरोग्यही चांगले राहते. चांगल्या आहारातून शरीराला आवश्यक पोषकद्रव्ये मिळत असतात त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात फळे, पालेभाज्या, कडधान्य या पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे. फळांमध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचे प्रमाण असण्याबरोबरच पोषकद्रव्येही असतात. त्यापैकीच असे एक फळ आहे ज्याच्या सेवनामुळे अनेक शारीरिक व्याधींपासून सुटका करता येते. अॅप्रिकोट हे असं फळं आहे ज्याच्यापासून अनेक समस्या दूर ठेवता येऊ शकतात. याच फळाचे काही फायदे देबिना चक्रवर्ती यांनी सांगितले आहेत ते पुढीलप्रमाणे… अॅप्रिकोट हे फळ विशेष गुणकारी असून याच्यापासून तयार होणारे ज्युस हे स्वास्थवर्धक पेय असल्याचे सांगण्यात येतं. या फळाच्या सेवनामुळे त्वचेला तजेला मिळतो त्याचबरोबर केसांची वाढही होते. अॅप्रिकोटमध्ये व्हिटामिन्स आणि अंटी अॅक्सिडेंट्सचे प्रमाण अधि असून यात मॅग्नेशिअम,आर्यन, कॉपर,पोटॅशिअम,फॉस्फरस आणि अन्य पोषकद्रव्यांचे प्रमाण अधिक असतं. या फळामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची क्षमता अधिक असते. १. डोळ्यांसाठी उपयुक्त - डोळे हा मानवी शरीरातील महत्वाचा भाग आहे. डोळ्यांमुळे आपल्याला ही सुंदर सृष्टी पाहता येत आहे. मात्र आता अनेक तरुणी डोळ्यांवर मेकअप करत असतात त्यामुळे या मेकअपमधील रासायनिक घटक डोळ्यांच्या पापण्यांवर जमा होतात. तसेच सतत कॉम्प्युटरवर काम केल्यामुळेही डोळ्यांवर ताण येतो. या समस्यांपासून वाचण्यासाठी अॅप्रिकोटपासून तयार केलेल्या ज्युसचे नक्कीच सेवन करायला हवे. अॅप्रिकोटच्या ज्युसमध्ये 'व्हिटॅमिन अ'चे प्रमाण अधिक असते आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी शरीरात 'व्हिटॅमिन अ'चे प्रमाण योग्य असले पाहिजे. शरीरात जर 'व्हिटॅमिन अ'ची कमतरता असेल तर अशा व्यक्तींनी अॅप्रिकोटच्या ज्युसचे नक्कीच सेवन करायला हवे. २. त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त - लांबसडक केस आणि नितळ त्वचा मिळवणे ही प्रत्येक तरुणीची इच्छा असते. मात्र बदलत्या जीवनशैलीचा परिणाम केसांवर आणि त्वचेवर होत असतो. अनेक महिला त्वचेतील ओलावा कमी झाल्यामुळे किंवा केस गळत असल्यामुळे त्रस्त झालेल्या असतात. अशा व्यक्तींनी अॅप्रिकोट खाल्ले पाहिजे. अॅप्रिकोटमध्ये 'व्हिटॅमिन अ' प्रमाणेच 'व्हिटॅमिन सी'चे प्रमाणही भरपूर असते. तसेच 'व्हिटॅमिन सी'मुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि त्वचेला तजेला मिळतो. त्याप्रमाणेच केस गळत असतील तर केसगळतीही काही काळात कमी होऊ लागते. ३. रक्ताची कमतरता भरुन निघते - शरीरामध्ये रक्ताभिसरणाची क्रिया सुरळीत सुरु असेल तर अनेक आजार आपल्यापासून कोसो अंतर दूर राहतात. त्यामुळे शरीरातील रक्त शुद्ध असणे गरजेचे आहे. तसेच शरीरामध्ये रक्ताचे प्रमाणही समतोल असणं अत्यंत गरजेचे आहे. रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास अनेक आजार उद्भवू शकतात त्यामुळे शरीरातील रक्त वाढीस लागेल अशा फळांचा, भाज्यांचा आपल्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे. त्यातीलच एक फळ म्हणजे अॅप्रिकोट. अॅप्रिकोटमध्ये आर्यन आणि कॉपर ही पोषकतत्वे असतात. ही पोषकतत्वे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रणात ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे आपल्या आहारात अॅप्रिकोटचा समावेश करणे गरजेचे आहे. ४. हाडे बळकट करण्यासाठी - शारीरिक कामे करायची असतील तर हाडांमध्ये बळकटी असणं गरजेचं आहे. शरीरातील हाडे बळकट करण्यासाठी दूध,पनीर या सारख्या पदार्थांचा उपयोग होतो. मात्र असेही काही फळं आहेत ज्यांच्या सेवनामुळे हाडे मजबूत होतात. त्या फळांपैकीच एक फळ म्हणजे अॅप्रिकोट. अॅप्रिकोटमध्ये मॅग्नेशिअम, कॉपर,फॉस्फरस आणि मिनरल्स यांचे प्रमाण अधिक असते. या पोषकद्रव्यांमुळे ऑस्टियोपोरोसिस यासारखे आजार दूर राहतात. तसेच यात कॅल्शियमचे प्रमाणही अधिक असते. कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात त्यामुळे अॅप्रिकोटचे सेवन करायला हवे. ५.पचनसंस्था सुधारते - अॅप्रिकोटमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळे शरीरातील पचनसंस्था सुधारण्याचे काम या फळामध्ये असते. या फळामुळे पोटात निर्माण झालेला गॅस दूर होतो. तसेच चयापचया क्रियाही व्यवस्थित सुरु राहते. त्यामुळे अॅप्रिकोटचे दिवसातून एकदा तरी सेवन करावे.