उन्हाळा आणि फळांचा राजा आंबा यांचे एक अनोखे नाते आहे. उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे नको नको होणारा हा उन्हाळा केवळ आंब्यासाठी नक्की सुसह्य असू शकतो. कधी एकदा आंबा खातो असे अनेकांना झालेले असते. अतिशय मधुर आणि कितीही खाल्ले तरी मन न भरणारे हे फळ न आवडणारे क्वचितच. आंबा हे आवडणारे फळ असले तरीही तो आरोग्यासाठीही अतिशय चांगला असतो. आमरसाशिवायही, आंब्याचे आईस्क्रीम, मँगो शेक, आम्रखंड, असे एक ना अनेक प्रकार आपल्याला वेड लावून टाकतात. मात्र कोणतीही गोष्ट किती खायची याला काहीतरी प्रमाण असावे अन्यथा त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. पाहूयात आंबे खाण्याचे शरीराला असणारे फायदे आहेत. फायदे १. आंबा खाल्ल्याने वजन वाढते असा समज असतो. मात्र तो चुकीचा असून वजन कमी करण्यासाठी आंबा फायदेशीर ठरतो. २. आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे पुरेशा प्रमाणात असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायलाच हवे. ३. आंब्यात व्हिटॉमिन ए, आयर्न, कॉपर आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात. ४. आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते. याशिवाय नुसता आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणेही अधिक फायदेशीर ठरु शकते. ५. आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो. ६. आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत होते.