नुकतेच सर्व कंपन्यांनी आपल्या टॅरिफमध्ये बदल केले होते. तसंच रिलायन्स जिओने आपले टॅरिफ प्लॅन्स वाढवण्याची घोषणा केल्यानंतर अन्य कंपन्यांनीही आपल्या टॅरिफ प्लॅन्समध्ये ४० ते ४५ टक्क्यांपर्यंतची वाढ केली होती. अशातच सर्व कंपन्यांनी केवळ आपल्या नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल देण्याचा निर्णय घेतला होता. तसंच अन्य मोबाईल नेटवर्कसाठी फेअर युसेज पॉलिसी लागू करण्यात आली होती. परंतु आता एअरटेलनं ग्राहकांची वाढती नाराजी लक्षात घेता फेअर युसेज पॉलिसी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं पुन्हा एकदा सर्वच मोबाईल नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल देण्याची घोषणा केली आहे.

एअरटेलनं आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली. आम्ही तुमचं म्हणणं ऐकलं आणि आम्ही एक बदल करत आहोत. उद्यापासून (शनिवार) भारतात कोणत्याही मोबाईल नेटवर्कवर अनलिमिटेड प्लॅनचा वापर करणाऱ्या ग्राहकांना अनलिमिटेड कॉल करता येतील. यासाठी कोणतीही अट नाही, अशा आशयाचं ट्विट कंपनीनं केलं आहे.

ग्राहकांचं म्हणणं ऐकलं
एअरटेलनं रिलायन्स जिओप्रमाणेच ठराविक कॉलची मर्यादा ओलांडल्यानंतर आययूसी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता कंपनीनं हा हे शुल्क न आकारण्याचा तसंच अमर्याद कॉल देण्याचा निर्णय घेतला आहे. एअरटेलनं आपल्या प्लॅनमध्ये फेअर युसेज पॉलिसी लागू केल्यानंतर कंपनीच्या अनेक ग्राहकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. तसंच अनेक नेटकऱ्यांनी कंपनीच्या या निर्णयाचा विरोध केला होता. परंतु आता एअरटेलनं आपल्या ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी ६ पैसे प्रति मिनिटांचा दर
व्होडाफोन-आयडिया या कंपनीप्रमाणेच आपल्या नव्या प्लॅन्सची घोषणा करत एअरटेलनं अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी फेअर युसेज पॉलिसी लागू केली होती. तसंच फेअर युसेज पॉलिसीची मर्यादा ओलांडल्यानंतर ग्राहकांकडून ६ पैसे प्रति मिनिटांचा दर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आकता कंपनीनं आपला हा निर्णय मागे घेतला आहे.