ब्रेकफास्ट म्हणजेच सकाळची न्याहारी करणे आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते. न्याहारी ही राजाप्रमाणे करावी असेही आपल्याकडे म्हटले जाते. रात्रभर पोट रिकामे असल्याने सकाळी उठल्यावर शरीराला ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा शरीराला आवश्यकता असताना मिळाली तर त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. पण सकाळची हीच भूक जर मारली गेली तर त्याचे शरीरावर विपरित परिणाम होतात. मग आरोग्याच्या विविध समस्याही उद्भवतात. त्यामुळे ब्रेकफास्ट हा दिवसभरातील सर्व खाण्यांतील महत्त्वाचा भाग मानला जातो. पण अनेक महिला किंवा पुरुषही घाईत ब्रेकफास्ट करणे टाळतात. त्या वेळेची गरज म्हणून हे वागणे ठिक असले तरीही आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतात. पाहूयात ब्रेकफास्ट न केल्याने आरोग्यावर नेमके काय परिणाम होतात. १. कमी ऊर्जा - ब्रेकफास्ट करणे हे तुमच्यासाठी एक काम असू शकते मात्र दिर्घकाळासाठी ही अजिबात चांगली गोष्ट नाही. पण ब्रेकफास्ट तुम्हाला दिवसभरासाठीची ऊर्जा मिळवून देते. पण ब्रेकफास्ट न केल्यास तुम्हाला दिवसभर मरगळल्यासारखे वाटत राहते. हेही केवळ एका दिवसासाठी नाही तर सर्व दिवसांसाठी तुम्ही ब्रेकफास्ट करायलाच हवा. २. वजन - ब्रेकफास्ट न केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अनेक जण वजन कमी करण्यासाठी ब्रेकफास्ट करणे टाळतात. मात्र ब्रेकफास्ट टाळला तर तुमच्या शरीरातील ऊर्जा कमी होते आणि तुम्हाला जास्त खाण्याची इच्छा होते. अशावेळी स्निग्ध पदार्थ आणि गोड पदार्थ जास्त खावेसे वाटतात असे एका अभ्यासामध्ये दिसून आले आहे. ३. लहरी स्वभाव (मूड स्विंग्ज) - ब्रेकफास्ट केला नसेल तर तुम्हाला काही वेळाने अस्वस्थ वाटायला लागते. अशावेळी तुम्ही ब्रेकफास्टच्या ऐवजी कॉफी घेतल्यास तुमच्या शरीरातील कॅफीनची पातळी वाढते, त्यामुळे तेवढ्यापुरते ठीक वाटते. पण त्यानंतर मात्र तुमचा मूड सतत बदलत राहतो. ४. मेटाबॉलिझम - ब्रेकफास्ट केला नाही तर मेटाबॉलिझम मंद गतीने काम करतो. ब्रेकफास्ट न केल्यास शरीरातील आम्ल खवळते आणि जळजळ झाल्यासारखे होते. त्यामुळे ब्रेकफास्ट किंवा रात्रीचे जेवण न करणे याचे अतिशय वाईट परिणाम होतात.