देशातील व्यापाऱ्यांची अग्रणी संस्था, दी कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) Whatsapp आणि Facebook वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. Whatsapp ला नवीन प्रायव्हसी पॉलिसी लागू करण्यापासून रोखावं किंवा Whatsapp वर आणि Whatsapp ची मालकी असलेल्या फेसबुकवर बंदी घालावी, अशी मागणी CAIT ने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र लिहून केली आहे.

“नव्या प्रायव्हसी पॉलिसीनंतर युजरचा सर्व वैयक्तिक डेटा, पेमेंट ट्रांजेक्शन, कॉन्टॅक्ट्स, लोकेशन्स आणि अन्य महत्त्वाची माहिती, व्हॉट्सअपच्या हाती लागेल आणि त्या माहितीचा कंपनी भविष्यात कोणत्याही कारणासाठी वापर करू शकते. भारतात 20 कोटींपेक्षा जास्त Whatsapp युजर्स आहेत. यातल्या प्रत्येकाचा पर्सनल डेटा अतिशय महत्त्वाचा असून जर त्या डेटाचा गैरवापर झाला तर फक्त देशाच्या अर्थव्यवस्थेलाच नाही तर देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या नव्या पॉलिसीला रोखावे किंवा दोन्ही कंपन्यांवर थेट बंदी घालावी”, अशी मागणी CAIT ने पत्राद्वारे केली आहे.

(नवीन अटी स्वीकारा, नाहीतर अकाउंट Delete करा; WhatsApp ने अपडेट केली प्रायव्हसी पॉलिसी)

नवीन वर्षात Whatsapp ने आणलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नव्या प्रायव्हसी पॉलिसीला विरोध म्हणून गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हॉट्सअॅप बॉयकॉट करण्याची मोहिमही सुरू आहे. अशात आता देशातील व्यापाऱ्यांनी पुढाकार घेत Whatsapp ला नवीन प्रायव्हसी पॉलिसी लागू करण्यापासून रोखावं किंवा Whatsapp वर आणि Whatsapp ची मालकी असलेल्या फेसबुकवर बंदी घालावी अशी मागणी केली आहे.