गार पाण्याने हात धुणेही गरम पाण्याने हात धुण्याइतकेच आरोग्यास फायद्याचे असते, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. गार पाण्यानेही रोगजंतू काढून टाकले जातात असा दावा करण्यात आला आहे. दहा सेकंद हात पाण्याखाली धरले तरी रोगजंतू निघून जातात. अमेरिकेतील रूटगर्स विद्यापीठाचे डोनाल्ड शॅफनर यांनी सांगितले, की हात धुतल्यानंतर प्रत्येकाला सुरक्षित वाटत असते पण त्याचा परिणाम किती होतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे. रोगजंतू नष्ट होण्याशी पाण्याच्या तापमानाचा काही संबंध नाही. किमान सहा महिने २१ स्वयंसेवकांच्या हातावर जीवाणू वाढवण्यात आले. त्यानंतर त्यांना ६० अंश, ७९ अंश व १०० अंश तापमानाच्या ०.५ मि.लि, १ मि.लि. व २ मि.लि. पाण्याने हात धुण्यास सांगण्यात आले. हा अभ्यास एका दृष्टीने ऊर्जेची बचत करणारा आहे, कारण त्यात गार पाणीही तितकेच प्रभावी असते असे म्हटले आहे. कुठल्या प्रकारचा साबण किती प्रमाणात वापरला तर जीवाणू नष्ट होतात यावर मात्र अधिक अभ्यासाची गरज आहे. हात धुण्याचे प्रमाण वाढवणे हे सार्वजनिक आरोग्यासाठी हितकारक आहे. जेवण्यापूर्वी हात धुणे गरजेचे आहे असे जिम अबरेगास्ट यांनी म्हटले आहे, हे संशोधन ‘जर्नल ऑफ फूड प्रोटेक्शन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. रेस्टॉरंट व अन्न उद्योगासाठी मार्गदर्शक तत्त्वाकरिताही हे संशोधन महत्त्वाचे आहे, कारण दर चार वर्षांनी हे नियम बदलत असतात. सध्या हॉटेलांमध्ये ३७ अंश सेल्सियसचे पाणी हात धुण्यासाठी दिले जाते. जास्त तापमानाच्या पाण्याने हात खरोखर जंतुमुक्त होतात का यावर अजून चर्चा सुरूच आहे.