कोणत्याही मसालेदार पदार्थाची किंवा आमटी, उसळ यांची चव वाढवायची असेल तर त्यावर खमंग कढीपत्त्याची फोडणी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ही हवीच. आजही अनेक घरांमध्ये गृहिणी हमखास कोथिंबीरचा वापर जेवणात करतात. विशेष म्हणजे पदार्थाची चव वाढविणारी ही कोथिंबीर प्रचंड गुणकारी असून त्याचे काही फायदेदेखील आहेत. ते आज आपण जाणून घेऊयात. कोथिंबीर खाण्याचे फायदे – १. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. २. रोज सकाळी कोथिंबीरची १०-१२ पाने आणि पुदिन्याचे ७-८ पाने पाण्यात उकळून ते पाणी प्यावे. यामुळे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर टाकले जातात. ३. कोथिंबीरच्या नियमित सेवनामुळे अपचन, आम्लपित्त, जेवणावरील इच्छा कमी होणे, पोटात गॅस होणे या सारख्या समस्या दूर होतात. ४. आम्लपित्तामुळे घशामध्ये व छातीमध्ये जळजळ होत असेल व घशासी आंबटपाणी येत असेल तर एक चमचा धणेपूड व एक चमचा खडीसाखर (बारीक केलेली) यांचे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा घ्यावे यामुळे आम्लपित्ताचा त्रास कमी होतो. ५. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि शारीरिक थकवा दूर करण्यासाठी २ चमचे धणे आणि अर्धा इंच आलं हे सारं एक ग्लास पाण्यात उकळावं. त्यानंतर या पाण्यात गुळ घालून ते आटवावे आणि तयार धण्याचा चहा प्यावा. त्यामुळे भूक वाढते. ६. डोळ्यांची आग होत असेल,डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण झाली असतील तर अशा विकारांमध्ये कोथिंबीर गुणकारी आहे. ७. कोथिंबीरच्या सेवनामुळे हातापायांची जळजळ कमी होते. ८. वजन नियंत्रणात राहते. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)