देशभरात करोनामुळे झालेल्या मृत्यूंमधे मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्यांचे प्रमाण मोठे असून करोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता मधुमेह व उच्च रक्तदाब, मूत्रपिंडविकार व ह्रदय विकाराच्या रुग्णांनी यापुढे आपल्या जीवनशैलीचे काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे, असा इशारा लीलावती रुग्णालयातील विख्यात मधुमेहतज्ज्ञ डॉ शशांक जोशी यांनी दिला आहे.

भारतात करोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आपण मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार व वृद्ध लोकांनी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याचा प्राधान्याने विचार केला पाहिजे. भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी असून जवळपास आठ कोटी लोक मधुमेहाचे रुग्ण आहेत तर उच्चरक्तदाबाच्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. या रुग्णांच्या शरीरात प्रतिकारशक्ती कमी असल्याने करोनाचा विचार करून या रुग्णांनी आहार- विहार व पथ्यपाण्याची विशेष खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे डॉ शशांक जोशी यांनी सांगितले.

प्रामुख्याने मधुमेहाच्या रुग्णांची तीन महिन्याची सरासरी साखर ही सातच्या खाली असली पाहिजे. या रुग्णांनी कमी खाणे, वेळच्या वेळी खाणे व सावकाश खाणे गरजेचे आहे. सावकाश खाण्याला अत्यंत महत्व आहे. यामुळे खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते व साखरेत कमी रुपांतर होते. लॉकडाऊनमुळे बाहेर चालणे शक्य नसले तरी घरातल्या घरात किमान एक हजार पावले रोज चालले पाहिजे. त्याचप्रमाणे सर्वच रुग्णांनी माफक व वेळच्या वेळी खाणे, किमान सात ते आठ तासाची झोप घेणे गरजेचे आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेला विशेष प्राधान्य देऊन दिवसातून किमान दोन वेळा अंघोळ करणे, वेळोवेळी हातपाय स्वच्छ धुणे व टॉयलेट कायम स्वच्छ राखणे गरजेचे आहे. करोनाचा विषाणू हा केवळ खोकला व शिंक यातूनच नव्हे तर संडासच्या माध्यमातूनही पसरू शकतो हे लक्षात घेऊन स्वच्छतेला अग्रक्रम दिला पाहिजे, असे डॉ जोशी यांनी सांगितले.

तणावामुळेही शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते हे लक्षात घेऊन आनंदी रहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संगीत ऐका व अन्य कशातही स्वत: ला गुंतवून ठेवा आणि ताणतणावावर मात करण्याचा प्रयत्न करा. ह्रदय विकारासह वरील सर्वच रुग्णांनी वेळच्या वेळी औषध घेणे तसेच कोणताही त्रास वाटल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. सध्या बरेच सुशिक्षित नेट वा व्हॉट्स अ‍ॅप विद्यापीठावर जास्त अवलंबून असतात. व्हॉट्स अ‍ॅप विद्यापीठ हे अफवा पसरवण्याचेच काम जास्त करत असल्याने ते टाळणे सर्वात महत्वाचे असल्याचेही डॉ जोशी यांनी आवर्जून सांगितले. वृद्ध मंडळींनी विशेष करून लॉकडाऊनसारखी काळजी घेतली पाहिजे. अफवांच्या संपर्कात येणार नाही याची खबरदारी घेत वेळच्या वेळी औषध व खाण्यासह आपले दैनंदिन कार्यक्रम केले पाहिजे असेही ते म्हणाले.