वेदनाशामक, झोपेच्या गोळ्या आणि मानसिक आजारांची अनावश्यक आणि गरज नसलेल्या औषधांचे स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांकडून अधिक प्रमाणात सेवन केले जात असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.

हे संशोधन ‘जनरल्स ऑफ जेरोन्टोलॉजी : मेडिकल सायन्सेस’ या मासिकात प्रसिद्ध झाले आहे. अमेरिकेतील ‘याले’ आणि ‘केन्टकी’ या विद्यापीठांतील संशोधकांनी २,५०० लोकांच्या प्रकृतीचा अभ्यास केला आहे. वयोवृद्ध लोकांमध्ये स्मृतिभ्रंशाचे प्रमाण अधिक असते. स्मृतिभ्रंश झाल्यानंतर औषध सेवनाचे प्रमाण ११ टक्के वाढते. मात्र, त्याच वेळी अयोग्य औषधे सेवन करण्याचे प्रमाण १७ टक्क्यांनी वाढते, असे ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातील संशोधक दिनीजेला जिडीक यांनी सांगितले.

झोपेच्या गोळ्या, वेदनाशामक औषधे, मानसिक आजारावरील औषधे आणि आम्लपित्तावरील औषधे या अनावश्यक औषधांच्या सेवनाचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले. ही औषधे ठरावीक कालावधीसाठी वापरायची असतात, मात्र स्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्ती बऱ्याच मोठय़ा कालावधीपर्यंत या औषधांचे सेवन करतात, असे जिडीक यांनी सांगितले. अनावश्यक औषधांच्या सेवनाची अनेक कारणे आहेत. त्यात मार्गदर्शकांची कमी, डॉक्टरांचे दुर्लक्ष, कमकुवत आकलनक्षमता, आकलन आणि संवादातील अडचणी यामुळे हे प्रमाण मोठे आहे, असे त्यांनी सांगितले.