नवरात्र आणि दसरा झाला की सगळ्यांना वेध लागतात ते दिवाळीचे. फटाक्यांची आतिषबाजी, दिव्यांची रोषणाई, दारापुढे रांगोळी आणि घराघरात सुटलेला फराळाचा सुगंध. या सगळ्या वातावरणामुळे मन प्रसन्न होऊन जातं. दिवाळी म्हटलं की मुलांची फटाक्यांसाठी , नव्या कपड्यांसाठी गडबड सुरु होते. तर गृहिणी मात्र फराळ करण्यात मग्न होऊन जातात. अनेकदा काही जणींचा फराळ अत्यंत रुचकर होतो. मात्र, एखादा असा पदार्थ असतो जो मनासारखा होत नाही. यात साधारणपणे चकली हा पदार्थ करणं स्त्रियांना किचकट काम वाटतं. अनेकदा भाजणी चुकल्यामुळे किंवा तेल व्यवस्थित न तापल्यामुळे चकल्या एकतर मऊ पडतात किंवा त्या कडक होतात. त्यामुळेच परफेक्ट चकली कशी करावी हे आज जाणून घेऊ. साहित्य - १/२ किलो तांदूळ, २ वाटी चनाडाळ, १ वाटी उडीद डाळ, १ वाटी मूगडाळ, अर्धी वाटी धने, १/२ वाटी साबुदाणा, ३ ते ४ चमचे ओवा, २ चमचे साखर, मीठ चवीनुसार. कृती - प्रथम तांदूळ, चनाडाळ, उडीदडाळ, मूगडाळ घेऊन ते स्वच्छ धुवून स्वतंत्र वाळत टाकावं. मात्र हे पदार्थ कडक उन्हात न वाळवता पंख्याखाली वाळत घालावेत. त्यानंतर वरील पदार्थ वाळल्यानंतर ते मंद आचेवर भाजून घ्यावे. यावेळी साबुदाणादेखील भाजून घ्यावा. सगळे पदार्थ खमंग भाजल्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र दळून आणावेत. पीठ तयार झाल्यावर त्यात ओवा, मीठ, तिखट, हळद (आवड असल्यास चिली फ्लेक्स) घालावं. त्यानंतर कणकेप्रमाणे हे पीठ मळून घ्यावं. (पीठ शक्यतो घट्ट किंवा सैलसर मळू नये.) पीठ मळून झाल्यावर चकलीच्या साच्याला आतून तेल लावावं व तयार पीठाचे लहान गोळे करुन ते साच्यात भरावे. त्यानंतर गरम तेलात या चकल्या लालसर होईपर्यंत तळून घ्याव्यात.