प्रथिने, कर्बोदके, मेद, जीवनसत्त्वे, खनिजे, चोथा या सर्व प्रमुख मूळ अन्नघटकांपेक्षा कितीतरी अधिक महत्त्वाचा अन्नघटक म्हणजे “पाणी.’ आपल्या शरीराचे सरासरी सत्तर टक्‍के वजन हे पाण्याचे असते. शरीरातील प्रत्येक जिवंत पेशीस पाणी हे प्रथम हवे नंतर अन्न.
आपल्या शरीरासाठी पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार पाण्याची गरज वेगवेगळी असते. मात्र, खेळाडू आणि व्यायाम करणा-यांनी पाणी अधिक प्यावे. तसेच वृद्धापकाळी आंत्रकुजन कमी होते. त्यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण जास्त ठेवावे. पाणी कमी पिल्यास मूतखडा तयार होणे, युरीन इन्फेक्‍शन आदी त्रास संभवतात. यासाठी पाणी व त्याचे प्रमाण महत्त्वाचे आहे.
रोज जेवणाआधी दोन ग्लास पाणी प्या. शरीराला पुरेसे पाणी मिळते व पाण्यामुळे थोडे कमी खाल्लं जाते. पाणी प्यायल्यामुळे भूक कमी होते. परिणामी अन्न कमी घेण्याने वजन कमी होण्यास मदत होते.