दिवाळी आली की फटाके वाजवण्याचे प्रमाण राज्यात जास्त आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजवण्याच्या वेळेवर बंधन घातले असले तरीही फटाके वाजणारच असा सूर वारंवार आळवताना दिसतो. फटाके वाजवायला मजा येत असली तरीही ते आरोग्यासाठी अतिशय घातक असतात. फटाके आरोग्याला घातक असल्याने ते वाजवू नयेत असा प्रचार मागील अनेक वर्षांपासून होत असला तरीही दिवाळीच्या दरम्यान प्रदुषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतेच. याशिवाय फटाक्यांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे रुग्णालयातील रुग्णांची संख्याही वाढते. फटाक्यामुळे भाजल्याच्या, कर्णदोषाच्या आणि इतरही अनेक समस्या निर्माण झाल्याच्या घटना घडतात. पण फटाक्याच्या आवाजाने हृदयरोग आणि पक्षाघाताचा धोका जास्त असतो असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका अहवालातून समोर आले आहे. अमेरिकेतील एका मोठ्या रुग्णालयातील डॉक्टरांनी हा अभ्यास केला आहे. सतत मोठ्या आवाजात असणाऱ्या लोकांना हृदयरोग होण्याची शक्यता असते. यामध्ये फटाक्यांबरोबरच विमानतळ आणि महामार्गांचाही समावेश होतो. यामध्ये एकूण ४९९ लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यातील ४० जणांना हृदयरोग असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांची राहण्याची ठिकाणे विचारण्यात आली. त्यावरुन हृदयरोगाचा त्रास असणारे लोक जास्त आवाज असणाऱ्या भागात राहत असल्याचे लक्षात आले. आवाजाचा शरीरावर होणारा परिणाम आणि त्यामुळे वाढणारी हृदयाची धडधड याची निरीक्षणे नोंदविण्यात आली होती. त्यावरुन संशोधकांनी आवाजामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवत असल्याचा निष्कर्ष काढला. यामध्ये साधारणपणे ५० ते ६० वर्षे वयाच्या लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यामुळे या वयोगटातील लोकांच्या शरीरावर जास्त आवाजाचा विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. एकूणच दिवाळीत होणारे ध्वनी प्रदूषण लक्षात घेता ज्यांना आवाजाने अस्वस्थता वाढते त्यांनी फारकाळ जास्त आवाज असणाऱ्या ठिकाणी राहू नये असे सांगण्यात आले आहे.