हिरव्या भाज्या आणि शेंगा यासारख्या तंतुमय पदार्थाचे सेवन तणाव, चिंता, नैराश्य आतडय़ातील जळजळ या विकारांविरोधात उपयुक्त असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. तणाव ही आरोग्याची गंभीर समस्या असून यामुळे आतडे आणि मेंदूमध्ये मोठे बदल होऊ शकतात. हे बदल वर्तणुकीवर परिणाम पाडण्यास कारणीभूत असतात. मागील काही वर्षांत आतडय़ातील जीवाणू आणि चिंता, नैराश्य, आतडय़ातील जळजळ या सारख्या विकारांमध्ये दुवा शोधण्याचे काम संशोधकांकडून केले जात आहे. आतडय़ातील जीवाणू शॉट चेन फॅटी अॅसिड (एससीएफए) तयार करतात. हे आम्ल शरीरातील त्या भागांतील पेशींसाठी पोषणाचे मुख्य स्रोत आहेत. धान्य, शेंगदाणे, भाज्या यासारख्या तंतुमय पदार्थामुळे या एससीएफएच्या वाढीस चालना मिळते. एससीएफए आम्लांची निर्मिती झाल्यानंतर चिंता आणि तणावाचे प्रमाण कमी होत असल्याचे आर्यलडमधील कॉर्क विद्यापीठ आणि टेगास्क अन्न संशोधन केंद्र येथील संशोधकांना आढळले. त्याचप्रमाणे जास्त काळ तणावामुळे आतडय़ांवर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे आतडय़ांमध्ये जळजळ होते. तंतुमय पदार्थाचे सेवन केल्याने या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. या नव्या निकालांमुळे आतडय़ांतील जीवाणूचा मेंदू आणि वर्तणुकीवर होणाऱ्या परिणामांबाबत नवी माहिती समोर येते. या अभ्यासासाठी उंदरांवर प्रयोग करण्यात आले. शरीरविज्ञान आणि वर्तणुकीत, आतडय़ांतील जीवाणू आणि रसायनांमुळे होणाऱ्या बदलांबाबत अधिकाधिक दखल घेतली जात असल्याचे, जॉन एफ क्रॅन यांनी सांगितले. हा अभ्यास जर्नल ऑफ सायकोलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. एससीएफएबाबत अद्याप कमी माहिती मिळाली असून याचा अधिक अभ्यास करणे आवश्यक असल्याचे क्रॅन यांनी सांगितले.