ऑफिस म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी येतो कामाचा डोंगर, आठवड्याचे नियोजन, टार्गेट, बॉसगिरी यांसारख्या गोष्टी. यातही पहिल्यांदाच नोकरी करणार असू किंवा एखाद्या नवीन ठिकाणी रुजू होणार असू तर तिथले लोक कसे असतील? आपल्याला सामावून घेतील की नाही? पण यापालिकडेही एक गोष्ट प्रत्येक ठिकाणी असते ती म्हणजे त्या ऑफिसमधली मैत्री. नवीन असताना एकमेकांशी बिचकत बोलणारे आणि ऑफिसमधल्या व्यक्तीला कलिग म्हणणारे आपण जेव्हा त्याच्याशी शिव्या देऊन बोलायला लागतो तेव्हा त्या कलीगचा किंवा कलीगची 'दोस्त' केव्हा होऊन जाते आपले आपल्यालाच कळत नाही. सध्या घरानंतर आपण सगळ्यात जास्त कोणत्या ठिकाणी असतो असं कोणी विचारलं तर ते नक्कीच ऑफिस असतं. दिवसातील १० ते १२ तास सोबत राहिल्याने ऑफीस हे जणू आपले दुसरे घरच होऊन जाते. मग नकळत जुळणारे हे मैत्रीचे बंध इतके घट्ट होत जातात, की आपल्या खास मैत्रिणीला किंवा मित्राला भेटल्याशिवाय आणि बोलल्याशिवाय आपला दिवसही जात नाही. प्रत्येक ऑफीसमध्ये एक तरी असा व्यक्ती असतोच जो सगळ्या ऑफीसला बांधून ठेवण्याचे काम कोणाच्याही नकळत करत असतो. ती व्यक्ती सगळ्यांसाठीच खास असते. तिला सगळ्यांचीच सगळी सिक्रेट माहीत असतात. मग ही सिक्रेट कोणालाही शेअर करु नको असे सांगितल्यावर त्या व्यक्तीकडूनही ते प्रॉमिस पाळले जाते. नव्याने एखादा व्यक्ती ऑफीसमध्ये आला की त्याला कम्फर्ट करण्याचे कामही याच व्यक्तीकडे असते. मग नवीन व्यक्ती कधी जुन्या टीमचा भाग होऊन जाते आणि आपण या लोकांपासून कधी वेगळे नव्हतोच असे वाटायला लागते. ऑफिसमध्ये पाऊल ठेवल्यापासून ते रात्री घरी गेल्यावरही एकमेकांशी कनेक्ट राहणारे हे दोस्त आपल्या मनातील एक मोठी जागा व्यापून राहिलेले असतात. मी प्रोफेशनल राहणार असं तुम्ही कितीही म्हटलात तरीही ते नातं त्याच्या छान बहरत असतं. एकमेकांशी आपली दु:ख शेअर करण्यापासून ते नाईटआऊट आणि आऊटींग करण्यापर्यंत ही दोस्ती बहरत जाते. मग कामाच्या बाबतीतही कधी एखादी चूक झालीच तर बॉसच्या नकळत आपल्या मित्रमैत्रीणींना सावरुन घेणे. काम करताना एकमेकांची टर उडवणे यातून कामाचा ताण तर कमी तर होतोच पण ऑफीसमधले वातावरणही हलकेफुलके राहण्यास मदत होते. मग ऑफीसच्या पार्ट्यांबरोबरच एकमेकांचे वाढदिवस साजरा करणे, कोणाचे लग्न असेल तर त्याला केळवण देणे, दिवाळी, गणपती यांसारखे उत्सव साजरे करणे यात ही मैत्री आणखी घट्ट होऊ लागते. मग यातल्या एखाद्याला जरी नवीन जॉब मिळाला तरी बाकीच्यांची त्याच्या जाण्याच्या विचाराने होणारी घालमेल आणि त्या व्यक्तीचीही आपल्या मित्रमंडळींना सोडून जाताना होणारी अवस्था नकळत डोळ्याच्या कडा ओलावून जाते. सायली जोशी sayali.patwardhan@loksatta.com