वजन घटविण्यासाठी उत्तम कालावधी कोणता असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर त्याचे उत्तर उन्हाळा हे आहे. उन्हाळ्यात सूर्य लवकर हजेरी लावत असल्याने झोप नकळत कमी होते. यातच वाढत्या तापमानामुळे येणारा घाम आणि त्यामुळे अन्न कमी खाल्ले जाते. त्यामुळे नकळतच आपल्या वाढत्या वजनावर नियंत्रण येण्यास मदत होते. उन्हाने शरीराची लाहीलाही झालेली असताना पाणी, सरबते यांबरोबरच फळांचा आहारात जास्तीत जास्त समावेश ठेवावा असे सांगितले जाते. फळे खाण्याच्या अनेक फायद्यांपैकीच उन्हाळ्यात काही ठराविक फळे खाल्ल्याने वजन घटण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला वाढलेले वजन आणि चरबी कमी करायची असल्यास तुम्हाला कोणती फळे किती प्रमाणात आणि दिवसाच्या कोणत्या वेळेला खावीत याविषयी माहिती असायला हवी. पाहूयात अशाच काही फळांविषयी. कलिंगड - सहसा उन्हाळ्यात ठिकठिकाणी दिसणारे हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर असते. लालबुंद कलिंगड हे पाण्याचा सर्वाधिक अंश असणारे फळ असून त्यात ९२ टक्के पाणी असते. याबरोबरच कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए, बी ६, सी आणि अमिनो अॅसिड तसेच फायबरही असते. खरबूज - कलिंगडाचा लहान भाऊ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फळातही अनेक उपयुक्त घटक असतात. यामध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण भरपूर असते. ज्यांना जेवण झाल्यावर किंवा एरवीही गोड काहीतरी खाण्याची इच्छा होते ते गोड म्हणून खरबूजाचा नक्कीच विचार करु शकतात. आंबा - फळांचा राजा आणि उन्हाळ्यात येणारे स्पेशल फळ म्हणजे आंबा. आंबा गोड असल्याने वजन वाढते असा अनेकांचा समज असतो, मात्र तो चुकीचा असून आंबा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे पुरेशा प्रमाणात असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायलाच हवे. अननस - सध्या ठिकठिकाणी अननसाच्या गाड्या दिसतात. घरी सहजासहजी न कापता येणारे हे फळ बाजारात फोडींच्या स्वरुपात विकत मिळते. सहसा खाल्ले न जाणारे हे फळ आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी अननसाचा उपयोग होतो. लिची - लिची हे फळ आपल्याकडे म्हणावे तितके दिसत नाही. मात्र चवीला गोड असणारे हे फळ पाणीदार असल्याने ते वजन घटविण्यासाठी उपयुक्त असते. यामध्ये अँटीऑक्सिडंटस असल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी त्याचा उपयोग होतो.