श्रीकृष्ण जन्माष्टमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यातही गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. कृष्णाच्या जन्माचा हा दिवस एखाद्या सोहळ्याप्रमाणे साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवशी उपवास करुन कृष्णाची मनोभावे पूजा केली जाते. एखाद्या लहान बाळाप्रमाणे कृष्णमूर्तीला आंघोळ घालून त्याच्यासमोर भक्तीगीते म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. अनेक ठिकाणी रात्री १२ वजता हा कृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. यावर्षी अष्टमी २ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजून ४७ मिनिटांनी सुरु होणार आहे. आणि ३ तारखेला सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी संपणार आहे. जन्माष्टमीच्या दिवशी पूजेची वेळ रात्री ११ वाजून ५७ मिनिटांपासून ते १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत राहणार. भारतात कृष्णाला सर्वच जातीजमातीत देव मानले गेले आहे. कृष्णाची बाळकृष्ण, नटखट, सुंदर बासरी वाजविणारा, चक्रधारी, गोकुळातील राधिकांचा कन्हैय्या अशी अनेक रुपे महत्त्वाची मानली जातात. रासलीला हे त्याचे आणखी एक महत्त्वाचे रुप असून त्याचे देशातील काही ठिकाणी सादरीकरण होते. कृष्णाला विष्णूचाही अवतार मानले जाते. भगवान कृष्णाने मथुरेतील लोकांना कंसाच्या अत्याचारापासून वाचविण्यासाठी जन्म घेतला असे पुराणकथेत म्हटले जाते. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी असणाऱ्या दहीहंडीच्या सणालाही विशेष महत्त्व आहे. कृष्णाच्या लिलांपैकी एक असलेली ही लिला विशेष साजरी केली जाते. लबाड कृष्ण आपल्या मित्रमंडळींना घेऊन चोरुन लोणी खायचा असे म्हटले जाते. त्याचेच मोठे स्वरुप म्हणजे आताची दहीहंडी. विविध मंडळांतर्फे एकावर एक मानवी थर लावून हंडी फोडून हा सण साजरा केला जातो.