कारलं या भाजीचं नाव जरी घेतलं तरी अनेक जण नाक मुरडतात. परंतु चवीने कडू असणारं कारलं शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. मात्र केवळ चव कडू असल्यामुळे ते खाण्यासाठी टाळाटाळ केली जाते. विशेष म्हणजे कारलं लहान मुलांनी खावं यासाठी गृहिणी वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. बऱ्याच वेळा कारल्याचा कडूपणा जावा यासाठी महिला कारली चिरल्यानंतर त्याला मीठ लावून ठेवतात आणि त्यानंतर कारल्याला सुटलेलं पाणी टाकून देतात. परंतु असं केल्यामुळे भाजीतील जीवनसत्त्व पूर्णपणे वाया जाते. कारल्याला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. त्यामुळे कारलं कितीही नावडतं असलं तरी आहारात आठवड्यातून किमान एकदा तरी या जेवणात याचा समावेश करावा. कारलं खाण्याचे फायदे – १. कारल्याच्या रसामुळे रक्तशुद्ध होते. त्यामुळे त्वचा विकार होण्याचा धोका कमी होतो. २. कावीळ झाल्यानंतर ताज्या कारल्याचा रस काढून तो सकाळ, संध्याकाळ घेतल्यास कावीळ दूर होते. ३. यकृताच्या सर्व विकारांमध्ये कारल्याचा रस फायदेशीर असतो. ४. पोटात जंत झाल्यास कारल्याचा रस फायदेशीर ठरतो. पोटात कृमी किंवा जंत झाल्यास कारल्याचा रस प्यावा. ५. दमा, सर्दी, खोकल्याचा त्रास असेल तर कारल्याचा रस व तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून त्यात मध मिसळून महिनाभर घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून हे त्रास दूर होतात. ६. कारले हे शक्तीवर्धक आहे म्हणून लहानमुलांच्या आहारातही कारल्याचा समावेश आवर्जून करावा. ७. कफचा त्रास असलेल्यांना कारलं खाल्ल्ल्यांने आराम मिळतो. ८. पोटात गॅसची समस्या किंवा अपचन झालं असेल तर कारल्याने आराम मिळतो. ९. लखवा गेलेल्या रुग्णांनी कच्च कारलं खाल्ल्यास फायदा होतो. १०. कारल्यांच्या रसाचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी दूर होते. (ही बातमी जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)