तर्री असलेली मिसळ-पाव असेल तर त्याच्यासोबत तोंडी लावायला कांदा हा हवाच. अनेक वेळा डोळ्यातून पाणी काढणारा कांदा केवळ पदार्थाची चवच वाढवत नाही, तर त्याचे अन्यही गुणधर्म आहेत. शरीरासाठी गुणकारी ठरणारा कांदा घरातील वातावरण स्वच्छ ठेवण्यासही मदत करतो. अनेक वेळा केसगळतीमध्ये किंवा केसात कोंडा झाल्यावर कांद्याच्या रसाचा वापर करतात. मात्र हवा शुद्ध करण्यासाठीही कांद्याचा उपयोग होतो हे फार कमी जणांना माहित आहे. कांद्यामध्ये बॅक्टेरिया मारण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे अनेक जण घरातील हवा शुद्ध करण्यासाठी कांद्याच्या चकत्या घराच्या कोपऱ्यात ठेवतात. घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी घरात कायम हवा खेळती राहिली पाहिजे. तसंच मुबलक प्रमाणात सुर्यप्रकाश देखील आला पाहिजे. मात्र काहींच्या घरात सुर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात येत नाही. त्यामुळे सतत घरात अंधार जाणवतो. अशा ठिकाणी बॅक्टेरियाचं साम्राज्य लवकर पसरतं. त्यामुळे अशावेळी घरात कांद्याच्या चकत्या ठेवाव्यात.