मार्च महिना सुरु झाला की हळूहळू वातावरण तापू लागतं आणि उन्हाळाची चाहुल स्पष्टपणे जाणवू लागते. उन्हाळा म्हटलं की रणरणतं ऊन,सतत घशाला पडणारी कोरड, घाम या सगळ्या गोष्टी ओघाओघाने आपोआप समोर येऊ लागतात. त्यामुळे प्रचंड होणाऱ्या उकाड्यामुळे हैराण झालेला प्रत्येक व्यक्ती शीतपेय किंवा तत्सम थंड पदार्थांकडे आपसुकच वळतो. परंतु, हे थंड पदार्थ तात्पुरते शरीराला सुखावतात. त्यामुळे या शितपेयांऐवजी ताक, कोकम सरबत, सब्जा घातलेलं पाणी, नारळ पाणी हे घरगुती आणि नैसर्गिक पर्याय कायमच फायदेशीर ठरतात. त्यामुळेच शरीराला नैसर्गिक थंडावा देणाऱ्या सब्जाचे फायदे आज आपण जाणून घेऊयात. सब्जाच्या सेवनाचे फायदे - १. उष्णतेचे विकार दूर होतात. २.लघवीस त्रास होत असल्यास समस्या दूर होते. ३. मूत्रमार्गातील जंतूसंसर्ग (युरिन इन्फेक्शनचा) दूर होतो. ४. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. ५. वजन नियंत्रणात राहते. ६. शरीरातील पाण्याची पातळी भरुन निघते. ७. शरीराला थंडावा मिळतो. ८. पोटात जळजळ होत असल्यास आराम मिळतो. ९. पित्ताचा त्रास कमी होतो. सब्जाचे सेवन कसं करावं? सब्जाच्या काही बिया घेऊन त्या पाणी,सरबत किंवा दूध यात रात्रभर भिजत घालायच्या. त्यानंतर सकाळी भिजलेल्या बियांसकट हे पाणी किंवा दूध प्यायचं. तसंच दिवसभर साध्या पाण्यात घालून या बियांचं सेवन केलं तरीदेखील चालतं. अनेकदा फालुदा करताना या बियांचा वापरक केला जातो. दरम्यान, सब्जा हा तुळशीसारखाच एक लहानसा प्रकार आहे. सब्जा कोणत्याही ठिकाणी सहज रुजतो आणि वाढतो. साधारणपणे, पंजाबमध्ये सब्जाची रोपटी जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. सब्जाच्या झाडाचे बी हे तुळशीच्या बीपेक्षा किंचित मोठ्या आकाराचे व काळसर-करड्या रंगाचे असते. हे बी पाण्यामध्ये भिजवल्यावर ते फुगते व पाणी शोषून पांढरट रंगाचे व बुळबुळीत बनते. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)