आपण आहारात ज्या पदार्थांचा समावेश करतो त्याप्रमाणे आपलं शरीर घडत असतं. त्यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे आपण सेवन करत असलेल्या आहारावर अवलंबून आहे. आधुनिक जीवनशैली अधिकाधिक वेगवान होत आहे. त्यामुळे प्रत्येकालाच फास्टफूड, जंकफूड खाण्याची सवय लागली आहे. मात्र त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत आहे. सकस आहार मिळत नसल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे योगा इन्स्टिट्युच्या डॉ. हंसाजी जयदेव योगेंद्र यांनी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहार कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे सांगितलं आहे. आहारात शक्यतो सात्विक पदार्थांचा समावेश करावा. सात्विक आहार घेतल्यामुळे मन आणि मेंदू दोन्ही शांत राहतं. त्यामुळे आपलं आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहतं. त्यामुळे आहार सात्विक असावा. परंतु सात्विक म्हणजे नेमकं काय हे अनेकांना माहित नसतं. सात्विक म्हणजे साधं जेवण. ज्यात मसाले, तेल, मांसाहार यांचं प्रमाण कमी असेल. या सात्विक आहारात नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश होतो ते पाहुयात. सात्विक आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असतो? सात्विक आहार म्हणजे मूलत: संपूर्ण शाकाहार. यात बरीचशी मोसमी आणि ताजी फळे व भाज्या, डाळी, अखंड धान्ये, कडधान्ये, सुकामेवा, बिया, ताज्या हर्ब्जचा तसेच मध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश होतो. म्हणजे थोडक्यात यात सर्व मोसमी, ताज्या आणि स्थानिक स्तरावर घेतल्या जाणा-या उत्पादनांचा समावेश होतो. शक्यतो कच्च्या भाज्या खाणे चांगले, कारण शिजविल्याने त्यातील पोषक घटकांची हानी होते. सात्विक आहार अतिशय हलकाफुलका आणि पोषक असतो, ज्यामुळे त्याचे सहज पचन होते. अशाप्रकारचे अन्नपदार्थ रोगप्रतिकारकशक्ती, ताकत, उत्साह आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत करतात. सात्विक आहाराचा फायदा जेव्हा आपण सात्विक आहारपद्धती स्वीकारतो तेव्हा आपले मन अधिक सजग होते. सात्विक स्वभावाची व्यक्ती ही शांत, अक्षुब्ध, अविचलित, प्रसन्नचित्त असते. तिच्यामध्ये ऊर्जा, आरोग्य आणि सर्जनशीलतेचा संचार असतो व तिचे व्यक्तिमत्व संतुलित असते. या आहारपद्धतीमुळे वजनही आटोक्यात राहते. अर्थात याचा अर्थ तुम्ही वर सांगिलतेले सगळे पदार्थ हवे तेवढे खावेत, दिवसभर काही ना काही अखंडपणे तोंडात टाकत रहावे असा नाही. योगशास्त्रामध्ये मिताहाराची शिफारस केली आहे. मिताहार म्हणजे बेताचे खाणे. आपल्या पोटाचा अर्धा भाग सघन आहाराने तर एक चतुर्थांश भाग द्रव पदार्थाने भरायला हवा आणि उर्वरित एक चतुर्थांश भाग रिकामा सोडायला हवा म्हणजे उदरातील वायूंस हालचाल करण्यास पुरेशी जागा राहील. अन्न सेवन करण्यापूर्वी अन्नाप्रती कृतज्ञतेची भावना मनात आणण्याची सवय लावून घ्या. खाल्लेल्या अन्नातून जास्तीत जास्त पोषण मिळवायचे असेल तर ते हळूहळू आणि लक्षपूर्वक खायला हवे. जेवताना खूप पाणी पिऊ नये कारण त्यामुळे जठराग्नी विझून जाईल. या छोट्याशा कृतीचाही तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. बहुतांश आजार हे पहिल्यांदा आपल्या पचनयंत्रणेच जन्म घेतात. तेव्हा आपण योग्य खाण्याची, वेळेवर खाण्याची आणि आपल्या पचनसंस्थेला पचनक्रियेसाठी पुरेसा वेळ देण्याची खबरदारी घ्या. केवळ आहाराच्या सवयी बदल्याने आरोग्याच्या कितीतरी समस्यांवर यशस्वी मत करता येते.