सामान्यजन इसब, गजकर्ण, खरुज, नायटा यांची व सोरायसिस या विकाराची गल्लत करतात. सोरायसिस विकाराची कारणे, पाश्र्वभूमी काही वेळा आनुवंशिक तर काही वेळा अनाकलनीय असते. मात्र वर दिलेल्या चार त्वचाविकारांची कारणे, पाश्र्वभूमी स्पष्ट असते. संबंधित रुग्णाने स्वच्छतेची शंभर टक्के काळजी घेतली; खाणे, पिणे, कपडा, हवेतील खूप ऊन, थंडी, दमटपणा यांच्याबद्दल योग्य ते आरोग्यनियम पाळले तर या त्वचाविकारांना नेहमीकरिता लांब ठेवता येते. इसब बहुधा दोन प्रकारचे असते. कोरडे व ओले. याची कारणे सांसर्गिक किंवा खाण्यापिण्यातील आंबट, खारट, तिखट, शिळ्या अन्नाचा अतिरेक, अशी असू शकतात. गजकर्ण हा विकार बहुधा मान, खांदा या अवयवांना जास्त ग्रासतो. पुरुषांच्या केस कापण्याच्या हत्यारांमुळे किंवा खूप तिखट, खारट, आंबट शिळे अन्न वारंवार खाण्याने तो उद्भवतो. नायटा विकाराची बरीचशी कारणे गजकर्णासारखी असतात. शिवाय कपडय़ांची अस्वच्छता, चुकीची मलमे, उष्ण औषधे अशीही विविध कारणे असू शकतात. खरुज या विकाराची माझ्या लहानपणी खूप मोठी साथ होती. शाळेत एकाच बाकावर बसणाऱ्या बालकांना एकमेकांमुळे हा विकार होत असे. स्नानाचे पाणी शंकास्पद; तसेच नदी, नाले, ओढे येथील पाणी खराब तसेच साचलेले असल्यास हे विकार उद्भवतात, असलेले वाढतात. या विकारात घट्ट, अस्वच्छ वा ओले अंतर्वस्त्र, लंगोट, जांघ्या, चड्डय़ा हीपण कारणे असतात. ही कारणे टाळता आली तर त्वचाविकार लवकर बरे होतात. पुन्हा बळावत नाहीत. या रोगांकरिता आयुर्वेदतज्ज्ञ प्रवाळ, कामदुधा, चंदनवटी, महातिक्तघृत, रक्तशुद्धिकाढा, महामंजिष्ठादि काढा अशी औषधे; तसेच बाहेरून लावण्याकरिता विविध मलमे सुचवतात. ज्यांना साधे सोपे घरगुती उपचार करावयचे असतील त्यांनी संबंधित लक्षणांच्या जागा, मीठ मिसळून उकळलेल्या पाण्याने धुवाव्यात. स्वच्छ कापसाने वा कपडय़ाने पुसाव्यात. या जागांची आग होत असल्यास चांगले तूप, घरगुती लोणी किंवा खोबरेल तेल लावावे. खाज येत असल्यास करंजेल, कडुलिंबोणी तेल किंवा बावची तेल घालून लावावे. ताजी तुळशीची पाने मिळाल्यास, त्यांचा स्वरस काढून घासून लावावा. आग खूप होत असल्यास दुर्वाचा रस किंवा वाटलेल्या दुर्वाचा कल्क संबंधित अवयवांना लावावा. घरात खात्रीचे चांगल्या दर्जाचे चंदन असल्यास, त्याचे खोड सहाणेवर उगाळून ते गंध सकाळी किंवा दुपारी लावावे. काही वेळा या विकारांच्या कारणांत जंत, कृमी अशी कारणे असतात. जिभेवर ठरवीक पॅटर्नचे ठिपके खूप असल्यास काळी मिरी पावडर किंवा वावडिंग चूर्ण माफक प्रमाणात घ्यावे. पोट साफ होत नसल्यास चांगल्या दर्जाच्या बिया असलेल्या किमान पंचवीस-तीस काळ्या मनुका, चावून खाव्या. आहारात उष्णता, गरमी, उद्भवणारे पदार्थ असल्यास कोथिंबीर स्वच्छ धुऊन तिचा रस किंवा धन्याचे पाणी प्यावे. कोथिंबिरीचा चोथा लावावा. उचकी, ढेकर, अरुची एखाद्याला आपल्यासमोर उचकी लागली असल्यास; आपण त्याला विचारतो ‘काय रे, तुझी कोणी आठवण काढली?’ व्यवहारात असे काही नसते. उचकी किंवा ढेकरा याची कारणे फार गंभीर नसतात. तोंडाला चव नसताना, अन्न घ्यावयाची रुची नसताना, किंवा अन्नाचा प्रत्येक घास सावकाश न खाल्ल्यामुळे ही लक्षणे संभवतात. काही वेळा अवेळी, रात्रौ उशिरा राक्षसकाळी जेवण्यामुळेही हा त्रास होतो. आपल्या मनाप्रमाणे आहार नसल्यास, अन्न खूप तेलकट, तुपकट किंवा डालडायुक्त; फाजील गोड, शिळे असल्यासही हा त्रास उद्भवतो. कारणे छोटी छोटी असली तरी एकदा ‘उचकीवर उचकी’ लागायला लागली की माणूस हैराण होतो. तरुणाईला सहसा हा त्रास होत नाही. वृद्ध माणसाला, दीर्घकाळ बैठे काम करणाऱ्या व्यक्तीला हा त्रास होतो. क्वचित एखादवेळी उचकी लागली, ढेकरा अन्नाच्या किंवा कोरडय़ा असल्यास हा त्रास कमी- जास्त खाण्याने होतो असे समजावे. कोमट किंवा सुंठयुक्त गरम पाणी घ्यावे. वैद्यमंडळी प्रवाळपंचामृत, आम्लपित्तवटी किंवा पंचकोलासव, त्रिफलादी काढण्यासारखी औषधे सुचवितात. अशी औषधे लगेचच सुरू करण्याअगोदर पुढील प्रकारचे साधे सोपे घरगुती, फार खर्चीक नसणारे उपाय करावेत. जेवणाअगोदर आलेरस, लिंबूरस असे एकत्र चाटण करून खावे. प्रत्येक घास सावकाश व व्यवस्थित चावून खावा. जेवताना वारंवार पाणी पिऊ नये. पाणी कोमट किंवा सुंठयुक्त असावे. ज्यांना हा त्रास नेहमी होतो त्यांनी जेवणात आले, लसूण, पुदिना अशी चटणी खावी. कटाक्षाने वाटाणा, हरभरा, उडीद, बटाटा, रताळे; खूप तेलकट, तुपकट पदार्थ, मेवामिठाई, कोल्ड्रिंक,आइस्क्रीम, ज्यूस, उसाचा रस, फरसाण, चिवडा, भेळ मिसळ व मांसाहार टाळावा. जेवताना पोटांत थोडी जागा ठेवून, दोन घास कमी जेवावे. केळी, चिक्कू, सफरचंद, फणस, मोसंबी अशी फळे टाळावी. व्यायाम अजिबात होत नसल्यास बदाम, बेदाणा, काजू, जरदाळू, अक्रोड, पिस्ता असे सुकामेव्याचे पदार्थ किंवा मक्याची कणसे खाणे टाळावे. सायंकाळी लवकर जेवावे व दोन घास कमी जेवावे. रात्रौ जेवणानंतर पानावर थोडा वेळ स्वस्थ बसावे. हात धुऊन झाले की किमान वीस मिनिटे, अर्धा तास फिरून यावे. जो माणूस रात्रौच्या जेवणानंतर थोडा फिरून येतो त्याच्या डोक्यातील व पोटातील विकारांना आपोआपच आळा बसतो. ‘जो चालेल, तो वाचेल’; नुसता आळशासारखा झोपेल तो संपेल, या शास्त्रवचनाप्रमाणे वागू या. पोटाच्या तक्रारींवर औषधांशिवाय यश मिळवूया; शुभं भवतु. स्वच्छतेची शंभर टक्के काळजी घेतली; खाणे, पिणे, कपडा, हवेतील खूप ऊन, थंडी, दमटपणा यांच्याबद्दल योग्य ते आरोग्यनियम पाळले तर या त्वचाविकारांना नेहमीकरिता लांब ठेवता येते. response.lokprabha@expressindia.com सौजन्य - लोकप्रभा