पृथ्वीचा सर्वाधिक भाग ज्याप्रमाणे पाण्याने व्यापलेला आहे त्याचप्रमाणे शरीराच्याही अधिक भागात पाणी असते. पाण्यामुळे शरीरातील सर्व क्रिया सुरळीत चालू असतात. शरीराची योग्य पद्धतीने साफ व्हावे यासाठी पाण्याची आवश्यकता असते. दिवसभरात प्रत्येकाने किमान ३ ते ४ लिटर पाणी प्यावे असे आपण नेहमी ऐकतो. मात्र कामाच्या किंवा इतर कोणत्याही गोष्टीच्या नादात आपण पाणी पिणे पूर्णपणे विसरुन जातो. आता जास्ती पाणी प्यावे हे ठिक आहे. पण दिवसातील कोणत्या वेळात पाणी प्यावे. ते कशा पद्धतीने प्यावे, जेवणादरम्यान पाणी पिण्याचे कोणते नियम पाळल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल यांबाबत माहिती घेऊया. मात्र हे पाणी कसे आणि दिवसातील कोणत्या वेळेस प्यायलेले चांगले हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पाहूयात दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतील अशा काही सोप्या टीप्स १. दुपारी आणि रात्री जेवणाच्या १ ते पाऊण तास आधी आवश्यक तितके पाणी प्या. जेवणाची वेळ निश्चित असल्यास हे करणे जास्त सोपे होते. २. जेवताना मधे सारखे पाणी पिण्याची अनेकांना सवय असते. मात्र ते आरोग्यासाठी चांगले नसते. फारतर पोळी आणि भात खाण्याच्या मधे दोन घोट पाणी आणि जेवणानंतर दोन घोट पाणी पिणे ठिक आहे. पण त्याहून जास्त पाणी जेवताना पिऊ नये. ३. जेवणानंतर एक ते दिड तासाने पाणी प्यावे. त्यामुळे खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते. जेवताना आणि जेवणानंतर पाणी प्यायल्याने आपल्या पोटात पेटलेला अग्नी विझतो आणि पचनक्रियेमध्ये अडचणी येतात. ४. सकाळी उठल्यावर तोंड न धुता कोमट पाणी प्यावे. हे पाणी घटाघट न पिता एक एक घोट प्यावे. तोंडात रात्री जमा झालेली लाळ अतिशय औषधी असते. ५. कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्याच्या १० ते १५ मिनिटे आधी एक ग्लास पाणी प्यावं, यामुळे ऊर्जा वाढण्यास मदत होईल. व्यायाम करुन झाल्यानंतर २० मिनिटांनी पाणी प्यावे. ६. झोपण्याच्या आधी एर्धा ते एक तास पाणी प्यावे. एकदम झोपण्याआधी पाणी पिऊ नये. कारण पाणी पिऊन लगेच आडवे झाल्यास ते योग्य पद्धतीने शरीरात पसरण्यामध्ये अडचणी येतात. ७. आंघोळीनंतर न चुकता १ ग्लास पाणी प्यावे. आंघोळीमुळे शरीर काही प्रमाणात थकते. अशावेळी पाणी प्यायल्याने तरतरी येते. तसेच यामुळे रक्तदाबाचा त्रास उद्भवत नाही. ८. पाणी उभे राहून पिऊ नये. बसून पाणी प्यायल्याने शरीरात त्याचे जास्त चांगल्या पद्धतीने आवश्यक त्याठिकाणी वहन होते. उभ्याने पाणी प्यायल्याने नसांवर ताण येतो.