भारतीय संस्कृतीत जेवताना किंवा न्याहारी करताना खाली मांडी घालून बसण्याची रीत आहे. मांडी घालून बसल्याने खाल्लेल्या अन्नाचे पचन जास्त चांगल्या पद्धतीने होते. मात्र सध्या अनेक घरात डायनिंग टेबल असतात. त्यामुळे डायनिंग टेबलवर बसून जेवण्याची पद्धत सुरु झाली आहे. मात्र ऑफीसमध्ये किंवा काही समारंभांमध्ये किंवा एरवी घरीही घाईत असताना उभ्या उभ्या खाल्ले जाते. पण अशाप्रकारे खाणे आरोग्यासाठी तितके चांगले नसते. उभ्या उभ्या खाल्ल्याने पचनाशी निगडित बऱ्याच तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. पाहूयात उभे राहून खाण्याचे काही तोटे. १. उभे राहून खाल्ल्याने ते पचण्यासाठी बराच वेळ लागतो. तर उभे राहून खाल्ल्याने घाईघाईत व्यक्ती आवश्यकतेपेक्षा जास्त खाते. त्यामुळे जास्त खाणे आणि त्याचे मंदगतीने पचन यामुळे पोटाच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. २. उभे राहून खाल्ल्याने पाठीचा कणा तसेच मानसिक आरोग्याला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते. मात्र तेच खाली बसून खाल्ल्यास या तक्रारी उद्भवण्याची शक्यता कमी असते ३. खाली बसून खाणे केव्हाही चांगले. त्यातही मांडी घालून जेवण केल्याने ते पचनासाठी उत्तम असते. आपण घास घेण्यासाठी पाठीतून झुकतो आणि पुन्हा सरळ होतो. या क्रियेमुळे पोटातील स्नायूंची विशिष्ट पद्धतीने हालचाल होते आणि अन्न पचण्यास मदत होते. ४. खाली बसून खाण्याने पाठीच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. खाली बसणे आणि उठणे यामुळे शरीराची लवचिकता टिकून राहते. खाली बसल्याने पाठीच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. ५. सध्या लठ्ठपणा ही अनेक महिला आणि पुरुषांसमोरील मुख्य समस्या बनली आहे. हे वाढलेले वजन आटोक्यात ठेवणे आवश्यक असते. खाली बसून खाल्ल्याने जितकी भूक आहे तितकेच खाल्ले जाते. तर उभे राहून खाल्ल्याने गरजेपेक्षा जास्त खाण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खाली बसून जेवणे केव्हाही उत्तम. ६. खाली बसून खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया सुलभ होण्यास मदत होते. तसेच बसून खाल्ल्याने हृदयावर ताण येत नाही आमि हृदयाच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता कमी होते.