उन्हाळ्यामुळे अंगाची होणारी लाहीलाही आणि त्यामुळे घशाला पडणारी कोरड नकोशी होते. वातावरणातील तापमान वाढल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. यालाच आपण डिहायड्रेशन म्हणतो. डिहायड्रेशनमुळे आरोग्याच्या विविध तक्रारींचा सामना करावा लागू शकतो. त्यासाठी जास्तीत जास्त पाणी आणि सरबतांचा आहारात समावेश ठेवायला हवा असे वारंवार सांगण्यात येते. पण पाणी पिऊनही अनेकदा तहान भागत नाही. अशावेळी सरबतांचा समावेश केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. मात्र आपल्या दैनंदिन गडबडीत आपण सरबत पिण्याचे विसरुन जातो. आता सरबत नेमके किती आणि कोणत्या वेळी प्यावे. उन्हाळ्याच्या काळात आरोग्याला उपयुक्त असणारी सरबते कोणती, ते पिण्याचे फायदे याविषयी. १. सरबतांमुळे शरीराला थंडावा मिळतो तसेच शरीराची होणारी झीज भरुन काढण्यास मदत होते. २. पाणी प्यायल्याने तात्पुरता आराम मिळतो पण सरबतामध्ये असलेल्या मीठ आणि साखरेमुळे उर्जा टिकून राहण्यास मदत होते. ३. उन्हामुळे वातावरणात कोरडेपणा येतो, त्याचप्रमाणे शरीरालाही कोरडेपणा येतो. त्यामुळे या काळात सरबत प्यायल्यामुळे टवटवीत वाटते आणि कामातील उत्साह वाढण्यास मदत होते. ४. उन्हाळ्यामुळे अंगाची काहीली तर होतेच पण डोळ्यांची आणि हातापायांचीही जळजळ होते. हा त्रास होऊ नये यासाठी सरबते उपयुक्त ठरतात. ५. उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील अनेक द्रव्ये बाहेर टाकली जातात. त्यामुळे शरीरातील ताकद कमी होते आणि थकल्यासारखे वाटते. हे नुकसान भरुन काढण्यासाठी सरबते अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. ६. लिंबू, वाळा, कोकम, आवळा ही सरबते उन्हाळ्यात उपयुक्त ठरतात. ही सरबते घरच्या घरी तयार करणेही शक्य असते. बाजारात या सरबतांचा आगळही मिळतो. उन्हातून आल्यावर सरबत घेतल्यानी तरतरी येते आणि कामासाठी उत्साह राहतो. ७. आंबट, खारट, गोड हे तीनही रस शरीरासाठी आवश्यक असतात. सरबतांतून ते मिळाल्याने नकळत ताजेतवाने वाटते. सुगंधासाठी केशर आणि वेलदोडा घातल्यास आणखी फायदेशीर ठरते. ८. उन्हाळ्यात अनेकांना वाताचा त्रास होतो. हा त्रास कमी होण्यासाठी सरबते उपयुक्त ठरतात. तसेच इतरही अनेक तक्रारींपासून सुटका होण्यास मदत होते. वैद्य लीना बावडेकर, आयुर्वेदतज्ज्ञ