भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचं मोबाईल निर्मिती केंद्र म्हणून उदयास आला आहे, अशी घोषणा केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी केली. गेल्या पाच वर्षात, देशात २०० पेक्षा अधिक मोबाईल निर्मिती युनिट्स सुरु करण्यात आले आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली. रविशंकर प्रसाद यांनी यासंदर्भात माहिती देणारं एक ग्राफिकल प्रेझेंटेशन सोशल मीडियाद्वारे शेअर केलं आहे.

यानुसार, भारतात सन २०१४ च्या तुलनेत मोबाईल हँडसेट निर्मिती करणाऱ्या युनिट्समध्ये सन २०१९ मध्ये २०० टक्के वाढ झाली. यातील आलेखानुसार, २०१९-२० या आर्थिक वर्षात ३३० मिलियन (३ कोटी ३० लाख) मोबाईल फोन्सची निर्मिती करण्यात आली. या मोबाईल हँडसेट्सची एकूण किंमत सुमारे ३० मिलियन डॉलर इतकी आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलंय की, इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना भारताला ईएसडीएम क्षेत्रातील डेस्टिनेशन म्हणून विचारात घ्यावं. कारण त्यांना जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मिती केंद्राचा भाग होण्याची संधी उपलब्ध होत आहे. दरम्यान, केंद्र सरकार उद्या (दि.२) दुपारी १२ वाजता या क्षेत्रासाठी ‘थिंक इलेक्ट्रॉनिक्स थिंक इंडिया’ या नव्या योजनेची घोषणा करणार आहे.

‘अॅपल’ या स्मार्टफोन बनवणाऱ्या जगप्रसिद्ध कंपनीबरोबरच इतर अनेक स्मार्टफोन्स बनवणाऱ्या कंपन्या आता स्थानिक स्तरावर फोन तयार करण्याच्या विचारात आहेत. दरम्यान, याधाचीच अनेक स्मार्टफोन कंपन्या देशात त्यांची उत्पादनं घेत आहेत. दरम्यान, प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी शाओमी इंडियाचे प्रमुख मनू कुमार जैन यांनी नुकतचं ट्विट करुन सांगितलं की, त्यांच्या कंपनीचे Mi आणि Redmi या ब्रँडचे ९९ टक्के स्मार्टफोन्स भारतातच तयार केले जात आहेत. याचे ६५ टक्के पार्ट्स देखील भारतातच तयार केले जात आहेत.

अॅपलने यापूर्वीच Wistron and Foxconn या कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चर्सच्या सहकार्याने iPhone ची काही मॉडेल्स भारतातच तयार करण्यास सुरुवात केली आहे.