कोट्यवधी मोबाइल फोन वापरकर्त्यांच्या खिशाला भूर्दंड पडणार आहे. ग्राहकांना या महिन्यापासून कॉल करण्यासाठी आणि इंटरनेटचा वापर करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कारण, व्होडाफोन- आयडिया, एअरटेल आणि रिलायन्स जिओ या तिन्ही आघाडीच्या कंपन्यांनी दरवाढीची घोषणा केली आहे. २०१६ नंतर प्रथमच या कंपन्यांकडून दरवाढीची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या टेलिकॉम क्षेत्रातील ही आतापर्यंतची सर्वाधिक दरवाढ असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. व्होडाफोन- आयडिया आणि ‘भारती एअरटेल’ने मंगळवार, ३ डिसेंबरपासून मोबाइल सेवेच्या प्रिपेड शुल्कात सुमारे ५० टक्क्यांपर्यंतवाढ करण्याचे जाहीर केले आहे. त्यापाठोपाठ सर्वात स्वस्त दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या ‘रिलायन्स जिओ’नेही ६ डिसेंबरपासून सुमारे ४० टक्के दरवाढीची घोषणा केल्याने मोबाइल वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

रिलायन्स जिओच्या स्पर्धेत आतापर्यंत तुलनेने कमी दर ठेवून तग धरलेल्या व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या प्रिपेड दरवाढीमुळे संभाषण आणि मोबाइल इंटरनेट वापराचे दर जवळजवळ दुप्पट होणार आहेत. तसेच मोबाइल जोडणी महिनाभर अतूट राहावी यासाठी दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना किमान ४९ रुपयांचा ‘रिचार्ज’ करणे आवश्यक आहे.

एअरटेल :
* प्रतिदिन ५० पैसे ते २.८५ रुपये दरवाढ
* डेटा आणि कॉलिंगचे भरघोस फायदे देण्याचा दावा
* निश्चित कॉलमर्यादा ओलांडल्यास प्रतिमिनीट ६ पैसे

जिओ :
* ६ डिसेंबरपासून सुमारे ४० टक्क्य़ांपर्यंत दरवाढ
* नव्या प्लॅन्समधून ग्राहकांना ३०० टक्के अधिक लाभ देण्याचा दावा
’‘ऑल इन वन प्लॅन्स’ मध्ये अमर्याद संभाषण आणि इंटरनेट वापराचा दावा

व्होडाफोन-आयडिया :
* अन्य कंपन्यांच्या मोबाइलवर केलेल्या कॉलसाठी प्रतिमिनीट ६ पैसे
* दरवाढीमुळे १,६९९ रुपयांचा अमर्याद वार्षिक प्लॅन २,३९९ रुपयांवर
* प्रतिदिन १.५ जीबी डेटा वापराचा अमर्याद प्लॅन १९९ वरून २४९ रुपयांवर.