पावसाळा आला की ठिकठिकाणी साचणारे पाणी, त्यात होणारे डास आणि माश्या तसेच गढूळ पाणी यांमुळे सर्वच वयोगटात विविध आजार व्हायला सुरुवात होते. कधी नुसत्या ताप आणि सर्दीवर निभावते अन्यथा संसर्गजन्य आजार होतात. हे आजार दिर्घकाळ सुरु राहतात तसेच त्यावर योग्य ते उपचार घेणेही आवश्यक असते. त्यामुळे पावसाळ्यात आजारांपासून स्वत:ची सुटका करुन घ्यायची असेल तर योग्य वेळी योग्य ते उपाय करायलाच हवेत. तसेच आजारांची लक्षणे, उपचार याबाबत पुरेशी माहितीही असायला हवी. जाणून घेऊया अशाच काही आजारांविषयी…

स्वाईन फ्लू- ढगाळ हवामान असेल आणि हवामानाच्या कमाल आणि किमान तापमानात खूप फरक असेल एच् १ एन् १ आणि इन्फ़्लुएन्झा जातीच्या इतर विषाणूंचा संसर्ग होऊन स्वाईन-फ्लूची लागण सुरू होते.

श्वसनाचे आजार- पावसाळ्यातल्या सर्दी खोकल्याचे रुपांतर अनेकदा ब्राँकायटिस, अस्थमा, न्युमोनिया, सीओपीडी अशा गंभीर आजारांमध्ये होते. अशा केसमध्ये रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करून उच्च दर्जाची औषधे आणि प्राणवायूदेखील लावावा लागतो.

मलेरिया- पाऊस पडून गेला की जागोजागी पाणी साचून डबकी तयार होतात. त्यात तयार होणाऱ्या अॅनॉफेलिस डासांद्वारे मलेरिया फैलावतो. थंडी वाजून ताप येणे, हिमोग्लोबिन कमी होऊन कावीळ होणे ही लक्षणे दिसतात. मलेरियाच्या एका प्रकारात हा आजार मेंदूमध्ये शिरून रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो.

डेंगी- पावसात साचलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालणाऱ्या एडीस इजिप्ती नावाच्या डासांमुळे हा होतो. डेंगीचे विषाणू डासांद्वारेच माणसाच्या शरीरात शिरतात. या आजारात खूप ताप येतो, प्रमाणाबाहेर डोके दुखते, हातापायांचे सांधे, हाडे खूप दुखतात आणि महत्वाचे म्हणजे शरीरावर विशेषतः पाठीवर एक बारीक लालसर, न खाजणारी पुरळ येते. रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात. लघवी, शौच, थुंकीमधून तसेच शरीरांतर्गत रक्तस्त्राव होतो . यामध्ये रुग्णाची परिस्थिती अतिशय गंभीर होऊन तो दगावू शकतो.

चिकुनगुनिया- हा विषाणू हा एडीस जातीच्या डासांद्वारे स्वच्छ पाण्यात निर्माण होऊन पसरतो. यात दोन-तीन दिवस ताप येतो, डोके दुखते, अंगावर विशेषतः पाठ,पोट,कंबर या भागांवर पुरळ येते आणि हातापायांचे सांधे विलक्षण दुखू लागतात. हे दुखणे अतिशय तीव्र प्रमाणात असते. पायांचे घोटे, गुडघे, तळपायांचे सांधे यांना या आजारात विशेषकरून त्रास होतो. साधे चालणे, पायांची मांडी घालणेसुध्दा वेदनाकारक होते. आजार बरा झाला तरी पुढील बराच काळ हे हात-पाय दुखणे सुरूच राहते.

उपचार – पावसाळ्यात शक्यतो भिजणे टाळावे. रेनकोट, टोपी, छत्री, किमान पावसाळी जाकिट आणि टोपी तरी वापरावी. पावसात भिजल्यास लगेच अंग कोरडे करून पूर्ण वाळलेले स्वच्छ कपडे घालावेत. केस पूर्णतः कोरडे करावेत, लांब केस असलेल्या महिलांनी व मुलामुलींनी ही खबरदारी घ्यावी. खूप वेळ पावसात भिजून, अंगावर चिखल उडाला असल्यास गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ करावी. चिखलाने भिजलेले कपडे वेगळ्या बादलीतल्या पाण्यात भिजायला टाकावेत आणि त्यात डेटॉल किंवा सॅव्हलॉनसारख्या जंतूनाशक औषधाचे दोन चमचे न विसरता टाकावेत. चिखलातील काही कृमी किंवा जंतू इतर कपड्यात जाऊ नये यासाठी ही काळजी घेणे अत्यावश्यक असते. सर्दी खोकला झाल्यावर गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. शक्यतो थंड पदार्थ, थंड पेये, ज्यूस घेऊ नयेत. कडक ताप असल्यास किंवा खोकला सर्दी २-४ दिवसात कमी न झाल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला वेळ लावू नका.

डॉ. अविनाश भोंडवे

फॅमिली फिजिशियन