आहार हा सध्या सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. दिवसातून किती वेळा खावे यावरच्या चर्चांना सगळीकडेच उधाण आलेले दिसते. यातून आपण कोणता मार्ग निवडावा असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. यामध्ये दोन वेळा खावे की दर दोन तासांनी खावे असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र सत्या याच्या मधे असून शास्त्रीयदृष्ट्या अनेक गोष्टी सिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे दिवसातून तीन वेळा खाणे केव्हाही चांगले असे डॉ. नितीन पाटणकर सांगतात. यातही रक्तदाब योग्य ठेवणे आवश्यक असते. आपल्याकडे जुन्या काळापासून चालत आलेली दिवसातून तीन वेळा खाण्याची पद्धत केव्हाही चांगली आहे. शेतात जाताना न्याहारी, मग दुपारचे जेवण आणि संध्य़ाकाळी शेतातून आल्यावर रात्रीचे हलके जेवण अशी पद्धत होती. दोन वेळा जेवण्याने फायदे मिळतात पण ते बंद केले तर त्याचे वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. एक वेळा खाणे आणखीनच कठिण आहे. त्यामुळे तीन वेळा खाणे हा जगात मान्य असलेला उत्तम पर्याय आहे. अशाप्रकारे तीन वेळा खाणे आणि मधे काहीही न खाणे हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक होते. त्यामुळे या काळातील लोक संसर्गजन्य रोग झाला नाही तर नक्की ८० वर्षांहून अधिक काळ जगायची. याबरोबरच खाताना इतर कोणते विचार न करणे, टीव्ही न पाहणे, खाताना भांडण, कुचाळक्या न करणे हे आवश्यक आहे. अशाने व्यक्ती नक्की आरोग्यदायी जीवन जगू शकते. सर्वसामान्यांकरता मध्यम हाच सर्वोत्तम मार्ग आहे.