आपली जीवनशैली संतुलित असणे उत्तम आरोग्यासाठी गरजेचे असते हे सगळ्यांनाच माहित आहे. मात्र त्यासाठी नेमके काय करायचे याचे मात्र आपल्याला पुरेसे ज्ञान नसते. जीवनशैलीमुळे आरोग्य सुधारते यामागे प्राथमिक गोष्टी काय असतात हे समजून घेणे गरजेचे आहे. लहानपणी बहुतांश जण आरोग्यदायी आयुष्य जगत असतात. मात्र जसे मोठे होत जातो तसे आपण आजार ओढवून घेतो. याला आपली चुकीची जीवनशैली काही प्रमाणात कारणीभूत असते. आता हे आजार नेमके कसे होतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तर २० टक्के आजारांचे कारण हे आनुवंशिक असते, ५० टक्के मानसिक असते आणि बाकी ३० टक्के आहार, व्यायाम आणि इतर गोष्टींचा सहभाग असतो. यामध्ये मनाचा वाटा मोठा असून जीवनशैलीची सुरुवात कायम आपल्या मनापासून होते. आपल्या मनावर आपले नियंत्रण असेल तर आपण जीवनशैलीवर नक्की नियंत्रण मिळवू शकतो. यासाठी योगामध्ये अतिशय उत्तम थेरपी दिलेली आहे. त्याला धारणा थेरपी म्हणतात. सध्या आपल्याला काय वाटतं याबाबत व्यक्त होणे आणि मग त्याचे ट्रीगर शोधणे गरजेचे आहे. आहार आणि व्यायाम याबाबत काही करणे सोपे आहे. त्याची मुबलक माहिती सगळीकडे उपलब्ध आहे. मात्र जर मनाने ते ठरवले नाही तर त्याचा काही उपयोग नाही. या सगळ्यासाठी मनाचे प्रथमोपचार करणे आवश्यक असते. त्यामुळे तुमचे मन जास्तीत जास्त निरोगी राहण्यास मदत होते.