नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये तब्बल ३६५० जागांसाठी भरती प्रक्रिया होत असून या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट केवळ १०वी पास इतकीच आहे. नवी मुंबई, सोलापूर, पुणे, अहमदनगर, ठाणे या ठिकाणांवर ३६५० जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे.

यासाठी अर्जदार उमेदवाराचं वय किमान १८ वर्षे आणि अधिकाधिक ४० वर्षांच्या दरम्यान असावं, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. तर, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठीही ३ वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल आहे. सर्वसाधारण प्रवर्ग, इतर मागासवर्गीय प्रवर्ग आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा फी १०० रुपये इतकी आहे. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी द्यावी लागणार नाही. उमेदवार किमान १० वी पास असणं बंधनकारक असून अर्जदाराला कम्प्युटरचं आणि स्थानिक भाषेचं (मराठी) ज्ञान आवश्यक आहे.

ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, आणि ग्रामीण डाक सेवक पदांसाठी ही भरती होत असून अधिकृत संकेतस्थळावर एक नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. ३० नोव्हेंबर २०१९ अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.