मोबाईल हरवला तर त्याचा आयएमईआय (IMEI) क्रमांकावरून शोध घेतला जातो. पण अनेकदा बोगस आयएमईआय तयार केल्यानं त्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळं आता दूरसंचार विभागानं नवीन नियम तयार करण्याचा विचार सुरू केला आहे. आयएमईआय क्रमांकाशी छेडछाड केल्यास दंड आणि तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्याचा दूरसंचार विभागाचा विचार आहे. याच आयएमईआय क्रमांकावरून मोबाईलचा शोध घेण्यास मदत होते. दूरसंचार विभागाकडून तयार करण्यात येणाऱ्या नवीन नियमांमुळे बोगस आयएमईआय क्रमांक रोखता येतील तसंच मोबाईल फोन ट्रॅकिंग करणेही आणखी सोपे होईल. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, बनावट आयएमईआय क्रमांकांमुळे मोबाईल ट्रॅकिंग करणं कठिण होत होतं. त्यामुळं ते रोखण्यासाठी दूरसंचार विभाग ठोस पावलं उचलणार आहे. या विशिष्ट क्रमांकाशी छेडछाड केल्यास तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा केली जाऊ शकते. यासंबंधी नवीन नियम आणण्याचा दूरसंचार विभागाचा विचार सुरू आहे. दरम्यान, अशाच एका प्रकरणात काही दिवसांपूर्वी दिल्लीतील संगम विहार पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली होती. त्या तरुणांनी काही डिव्हाईसच्या मदतीने चोरीच्या स्मार्टफोनचे आयएमईआय क्रमांक बदलले होते. पोलिसांनी या टोळीला जेरबंद केले असले तरी बदललेल्या या विशेष क्रमांकामुळे चोरीचे फोन मूळ मालकांपर्यंत पोहोचवणे पोलिसांसाठी जिकिरीचे झाले होते. त्यामुळेच मोबाईलचे बोगस आयएमईआय क्रमांक तयार करण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मोबाईल फोन ट्रॅकिंग करणे सोपे व्हावे यासाठी दूरसंचार विभाग नवीन नियम तयार करत आहे. दूरसंचार विभागाने उचललेले पाऊल स्वागतार्ह असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतात मोबाईल बाजार वेगाने विकसित होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोबाईलच्या सुरक्षेसंबंधी कठोर नियम तयार करणे खूपच गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.