पाऊस म्हटलं की भजी किंवा तळणीच्या पदार्थांची आठवण येणं सहाजिक आहे. बाहेर पाऊस पडत असतानाच एवढं तेल खायचं का वगैरे असा विचार करून चालत नाही. म्हणूनच पावसाचा चांगला जोर चढलेला असताना त्याची रंगत वाढवण्यासाठी ख्यातनाम शेफ विष्णू मनोहर यांनी दिलेली ही खास खमंग, चटकदार अशा पोह्यांच्या कचोरीची रेसिपी. साहित्य – पातळ पोहे २ वाटय़ा मीठ चवीनुसार तेल २ चमचे आलं-लसूण पेस्ट १ चमचा बडीशेप अर्धा चमचा धणे-जिरे पावडर १ चमचा हळद तिखट चवीनुसार आमचूर पावडर अर्धा चमचा बेसन अर्धी वाटी मीठ आणि साखर चवीनुसार कोथिंबीर ४ चमचे तेल अर्धी वाटी कृती: २ वाटय़ा पातळ पोहे भिजवून त्याचे पाणी काढून टाका व त्यांना चांगले मळून त्यामध्ये चवीनुसार मीठ, २ चमचे तेल घालून बाजूला ठेवा. दुसऱ्या पॅनमध्ये २ चमचे तेलात १ चमचा आलं-लसूण पेस्ट परतून घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप, धने-जिरे पावडर, हळद, तिखट, आमचूर पावडर घालून मसाला परतून घ्या. नंतर यात अर्धी वाटी बेसन चवीनुसार मीठ, साखर घालून मिश्रण एकत्र करा. नंतर बारीक चिरलेला कोथिंबीर व पाण्याचा हबका मारून झाकण लावून शिजू द्या. भिजवलेल्या पोह्य़ाचा एक गोळा तोडून त्याची लाटी तयार करा. मधोमध मसाला भरून चारही बाजूने बंद करून दोन्ही हातांनी दाबून चपटे करा. तळण्यापूर्वी तेल मध्यम गरम करून त्यामध्ये तयार वाटय़ांना मधोमध दाबून वाटीसारखा आकार द्या. मंद आचेवर तळून घ्या. झाली तयार गरमागरम पोह्यांची कचोरी