केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षा पद्धतीमध्ये केंद्र सरकार मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), रेल्वे भरती मंडळ (RRB) आणि इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शनमधील (IBPS) रिक्त पदे भरण्यासाठी सरकार आता कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट घेणार आहे. एका विशेष एजन्सीमार्फत कम्प्युटरवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार, ही विशेष एजेन्सी नॉन- टेक्निकल पदांवर पदवी, बारावी आणि दहावी पास असणाऱ्यांसाठी CETs घेत सुरूवात करू शकते. ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील पदांसाठी सध्या स्टाफ सिलेक्शन कमीशन (SSC), रेल भर्ती मंडळ (RRBs) आणि आयबीपीएसमार्फत भरती केली जाते. ग्रुप बी आणि ग्रुप सी मार्फत सरकार दरवर्षी एक लाख २५ हजार जागांची भरती करते. यासाठी तब्बल दोन कोटी ५० लाख परिक्षार्थी असतात.

ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट या परीक्षेच्या अंमलबजावणीपूर्वी वैयक्तिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयानं नोटीस जारी केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलेय की, ‘सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना विविध परीक्षांना सामोरं जावं लागते. पण सर्व परीक्षांसाठी योग्यता एकसारखीच असते.या परीक्षांचे विविध टप्पे असतात. ज्यामध्ये Tier-I, Tier-II, Tier-III, स्किल टेस्टसारख्या परिक्षांचा समावेश आहे. Tier-I मध्ये कम्प्युटर बेस्ड ऑनलाइन मल्टीपल-च्वॉइस टेस्ट असते.’ केंद्र सरकारने या प्रस्तावावर लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. त्यानंतर केंद्र सरकार या सर्व बाबींचा अभ्यास करून निर्णय घेणार आहे.