ख्रिसमसला आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. असेच गिफ्ट 4000 मुलांना मिळाले आहे. विशेष म्हणजे हे गिफ्ट चक्क रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांच्याकडून मिळाले आहे. मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात हा सोहळा पार पडला आणि हातात गिफ्ट पाहून तब्बल 4 हजार मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. वांद्रे-कुर्ला संकुलात 'जिओ वंडरलँड'मध्ये भारतातील सर्वात मोठ्या ख्रिसमस ट्रीजवळ नीता अंबानी आणि ईशा अंबानी-पिरामल यांनी ख्रिसमसचा सण साजरा केला. 100 फूट उंच या ख्रिसमस ट्रीची सर्वात मोठी खासियत म्हणजे प्लास्टिक बाटल्या रिसायकल करुन या ख्रिसमस ट्रीची निर्मिती करण्यात आलीये. रिलायंसच्या सर्व कर्मचाऱ्यांना पर्यावरणाच्या संरक्षणासाठी निरुपयोगी प्लास्टिक बाटल्या गोळा करण्यास सांगण्यात आलं होतं. त्या सर्व बाटल्यांना रिलायंस फाउंडेशनने रिसायकल केले, त्यानंतर त्यापासूनच ख्रिसमस-ट्री बनविण्यात आला. पाहा व्हिडीओ - मुंबईमध्ये रिलायंस फाउंडेशनकडून जिओ गार्डनमध्ये एका 'वंडरलँड'ची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये लहान मुलांच्या मनोरंजनासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. ख्रिसमसनिमित्त सांताक्लॉजसोबत भरपूर मज्जा करता यावी यासाठी मुंबई आणि जवळपासच्या 4 हजाराहून अधिक गरीब विद्यार्थ्यांना वंडरलँडमध्ये मनोरंजनासाठी बोलावण्यात आले होते. त्यानिमित्त बोलताना, "लहान मुलं हे उद्याचे भविष्य आहे. कोणताही आनंद सर्वप्रथम लहान मुलांसोबत साजरा करावा असं मला नेहमी वाटतं. या चार हजार मुलांना जिओवंडरलँडचा अनुभव घेण्याची संधी मिळाली याचा खूप आनंद आहे", असं नीता अंबानी म्हणाल्या. यावेळी नीता अंबानी आणि सांताक्लॉजने लहानग्यांना खास गिफ्टही दिले.