मोबाईल फोन्समधून निघणाऱ्या लहरी मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या असतात की नाही, याबद्दल जगात अनेक मतप्रवाह आहेत. मात्र, नुकत्यात झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांनी मोबाईल फोन किंवा मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या लहरींचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नसल्याचे सांगितले. मोबाईलच्या वापरामुळे उत्पन्न होणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींमुळे धोकादायक आजार होऊ शकतात, अशी विधाने कोणत्याही शास्त्रीय आधाराविना केली जातात असे मत सीओएआय संघटनेने आयोजित केलेल्या परिषदेत मांडण्यात आले. काही लोकांकडून निव्वळ व्यवसायिक लाभासाठी अशाप्रकारच्या अफवा समाजात पसरवल्या जातात. चुंबकीय विद्युत क्षेत्राच्या संपर्कात आल्याने लोकांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नसल्याचे, जगभरातील काटेकोर आणि स्वतंत्र संशोधनातून अनेकदा निष्पन्न झाल्याचेसुद्धा यावेळी सांगण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका पाहणीनुसार, जगभरात सध्या ६०० कोटी लोक मोबाईल फोनचा उपयोग करतात. मोबाईलसाठी वापरण्यात येणाऱ्या चुंबकीय विद्युत लहरी या अत्यंत कमी क्षमतेच्या असून, त्यामुळे मानवी आरोग्याला कोणताही गंभीर धोका उद्भवू शकत नसल्याची माहिती टाटा वैद्यकीय केंद्राचे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट राकेश जलाली यांनी दिली.