जर आपण शंभर टक्के फळांचा रस घेतला तर त्यामुळे रक्तशर्करेचे प्रमाण वाढत नाही, त्याचा ग्लायसेमिक नियंत्रणावर परिणाम होत नाही, असे संशोधनात दिसून आले आहे. याचा अर्थ साखर न टाकलेले फळांचे रस प्रकृतीस फारसे हानीकारक नसतात असा आहे. यापूर्वीच्या काही अभ्यासांत हाच निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यानुसार शंभर टक्के फळांचा रस जर घेतला तर त्यामुळे मधुमेह (टाइप दोन) होण्याचा धोका नसतो. शंभर टक्के फळांचा रस व रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण यांचा संबंध तपासला असता त्यात हे दिसून आले आहे. उपवासानंतरची ग्लुकोज शर्करा व इन्शुलिन यांचा यात बायोमार्कर्स म्हणून वापर करण्यात आला होता. सफरचंद, बेरी, सायट्रस, द्राक्षे, डाळिंब यांचा साखर न टाकलेला रस सेवन केल्यानंतर १८ चाचण्यांच्या आधारे मेटॅअॅनॅलिसिस करण्यात आले असता त्यात मधुमेहाचा धोका नसल्याचे दिसून आले. टाइप २ प्रकारचा मधुमेह हा शरीर इन्शुलिनला प्रतिसाद देत नसल्याने होतो. यात आरोग्यदायी जीवनशैली हाच खरा उपाय आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम व प्रमाणात वजन या गोष्टी त्यासाठी महत्त्वाच्या आहेत. जर्नल ऑफ न्यूट्रिशनल सायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध शोधनिबंधानुसार जर ११९ मि.लि. फळांचा रस घेतला तर त्यामुळे हानी होत नाही. फक्त फळांच्या रसात साखर टाकू नये तरच त्याचा फायदा होतो. फळांचा रस दुधात घालून कधीच घेऊ नये. शिवाय चोथा गाळून हा रस घेणेही हानीकारक असते.