सरळ वळण
मन स्वच्छंदी पाखरासारख्या भराऱ्या घेत असतं आणि शरीर मात्र ऑफिस, संसार नामक पिंजऱ्यात अडकलेलं असतं. या चौकटी मोडण्याची इच्छा तर जबरदस्त असते, पण..

चेहऱ्यावर कुठलेही भाव येऊ न देता, हृदयाचे ठोके वाढवत, मेंदूत असंख्य प्रश्नांचं, विचारांचं काहूर माजणं म्हणजे भुस्काट. प्रचंड काहीतरी करण्यासाठी हात भयंकर शिवशिवत असतात. पण कपाळावर आठी न आणता समोरच्या कळपाटावरच त्या शिवशिवणाऱ्या हातांची बोटं फिरवत राहणं म्हणजे भुस्काट दाबणं. या दोन्ही क्रिया एकाच वेळी उफाळून येण्याची वारंवारता ही वाढत्या वयासोबत वाढत जाते. गंमत म्हणजे हे भुस्काट कधी, कसं, कुठे, का, कशा प्रकारे होईल याची काहीच शाश्वती नसते. पण आयुष्यातल्या एका विशिष्ट फेजमध्ये विशिष्ट प्रकारचं भुस्काट होण्याला सुरुवात होते. कसंय, स्वप्नं आणि वास्तव यांच्यात असणारा फरक हा फारच भयावह असतो. कॉलेजात असताना पाहिलेली स्वप्नं ही नोकरी-धंद्याच्या गिरणीत सापडली की त्यांचा चक्काचूर होतो. कॉलेजात असताना पैशाअभावी ती स्वप्नं सत्यात उतरत नाहीत. आणि मग मोठं झाल्यावर कामकाजाची कात्री त्या स्वप्नांची नक्षी बनवून मनालाच तोरण लावून टाकते. हे तोरण जेव्हा जेव्हा फडफडतं, तडफडतं, चरफडतं तेव्हा तेव्हा भुस्काट होत असतं.

बाहेर लख्ख उजेड असतानाही झगमगत्या दिव्यांच्या प्रकाशात बसण्याची परिस्थिती ओढवणं म्हणजे कॉर्पोरेट ऑफिसच्या पायऱ्या चढणं. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. तसं आजच्या जमान्यात कसलीही पॅशन असणाऱ्या वेडय़ाने शुष्क कॉर्पोरेटच्या पायऱ्या चढता कामा नये. तारुण्यातली उमेदीची, बेभान-बेफाम-मुक्त जगण्याची र्वष ही त्या शिष्टाचाराची परिसीमा असणाऱ्या कॉर्पोरेटमध्ये वाया घालवूच नये. गफला काय माहित्येय का, त्या निरस, भगभगीत, दिखाव्याच्या दुनियेत शिरलं ना की माणूस स्वतचा राहतच नाही. नाका, कट्टा, कॅण्टीन या जिवंतपणाचं लक्षण असणाऱ्या तीर्थक्षेत्रांच्या बरोबर अशा उलटय़ा जागा म्हणजे क्युबिकल्स, केबिन आणि डेस्क. या अशा जागा आहेत जिथे फक्त आणि फक्त आकडेच जिवंत असतात, जिथे फक्त टाग्रेट्सच्या चर्चा रंगतात, जिथे फक्त एक्सेल शीट आणि प्रेझेंटेशन्समध्येच क्रिएटिव्हिटी दाखवायची असते. बाकी आवडी-निवडी, छंद-िबद, पॅशन वगरे हे सगळं त्या रेझ्युमेवरच राहतं. आणि ती फाइल कुठेतरी धूळ खात पडलेली असते.

पण अचपळ मन माझे कुणाच्याच हातात येत नसतं. वाट दिसेल तिथे सुस्साट उडत असतं. मग कधीतरी मन विरुद्ध मेंदू असा नेहमीचा संघर्ष उद्भवतो. उदयपूर-जोधपूरच्या गल्ल्यांमध्ये मन फिरत असतं आणि मेंदू मात्र एक्सेल शीटच्या त्या आयताकृती चौकोनांची सर करत असतो. मनाला अंदमानचा निळाशार समुद्रकिनारा खुणावत असतो तर मेंदूला पॉवर पॉइंटच्या स्लाइड्स. तवांग, रोहतांगच्या पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये मन गारेगार होत असताना डेडलाइन नामक क्रूर लक्ष्मणरेखेमागे मेंदूचे दशावतार सुरू असतात. चेरापुंजीच्या धुवांधार पावसात मन चिंब भिजत असतं आणि मेंदूमध्ये मात्र नवीन प्रॉडक्ट लाँचसाठी कॅम्पेन शिजत असतं. शाळेत असताना जसं आपण वर्गात आणि मन वर्गाबाहेर असायचं तसाच हा प्रकार असतो. तिथे मनाला पुन्हा बाकावर खेचून आणायचं काम शिक्षक करायचे आणि आता ते काम मेंदू करतो. खरंतर या सगळ्यामध्ये दोष हा त्या मेंदूचा नाही. पोट भरण्यासाठी एकदा मार्गाला लागलं की बाकी अवांतर मार्ग आपोआप बंद होतात. अर्थात पूर्णपणे बंद होत नसले तरी त्या मार्गावर सदासर्वदा नाकाबंदीच असते.

कॉर्पोरेट आणि तत्सम साऱ्या कचेऱ्या-कार्यालयं, थोडक्यात नोकरी म्हणजे एक प्रकारचा सोन्याचा पिंजरा आहे. या पिंजऱ्यात एकदा का माणूस अडकला की मग तो त्या पिंजऱ्याचा गुलाम होऊन जातो. प्रपंचासाठी प्रत्येक जीव हा कुठल्या ना कुठल्या तरी पिंजऱ्यात स्वतला कोंडून घेत असतो. तिथे एकदा का प्रवेश झाला की स्वप्नांचे, पॅशनचे पंख छाटले जातात. कुठल्याही परिस्थितीत पैसे हे कमवावेच लागतात. त्यामुळे पशाची जमवाजमव करताना आवडी-निवडींचा हात सुटतो आणि त्या जत्रेत हरवून जातात. पोटापाण्यासाठी काही ना काहीतरी उद्योगधंदा, नोकरी वगैरे हाताला लागत असते हे मान्यच आहे. पण त्यासाठी ही इतकी मोठी आहुती द्यावी लागत असते याची शिकवण कधी कुठल्याच शिक्षकाने दिली नाही. बाकी बाहेरच्या जगात वावरताना काय काय कसरती कराव्या लागतात याचे धडे जसे स्वतच धडपडत गिरवले तशीच ही शिकवणही एकलव्याप्रमाणे स्वाध्यायानेच पूर्ण केली.

प्रपंचासाठी पॅशनचा देण्यात येणारा बळी हा तमाम तरुणाईच्या मनातला एक नाजूक कोपरा आहे. कॉलेजच्या कट्टय़ा-नाक्यावर जी स्वप्नं आणि आवडी-निवडी घेऊन मैफिली रंगवल्या त्याचा नोकरीने पार बेरंगच करून टाकला. कॉलेजात असताना जो मौल्यवान समजला जायचा असा ‘फावला वेळ’, नोकरी-धंद्याने स्वतच्या नावावर केला आणि तिथेच पॅशन विरुद्ध प्रपंच अशा प्रॉपर्टीच्या वादाला तोंड फुटलं. कोणे एकेकाळी गळ्यात कॅमेरा घालून जंगलं, डोंगर-दऱ्या-किल्ले पालथे घालणाऱ्या कुण्या एकाच्या पावलांच्या शटर स्पीडला नोकरीने ब्रेक मारला. तर कधी काळी गिटारच्या तारांमधून सुरांचा स्वर्ग उभा करणाऱ्या बोटांना सोन्याच्या िपजऱ्यात कीबोर्डवरच नाचण्याचे दिवस आले. हातात ब्रश घेऊन कॅनव्हासवर रंगांचे फराटे मारणाऱ्या कुणा चित्रकाराचे हात आता पायचार्ट आणि बार डायग्रामच्या रंगांपुरतेच मर्यादित राहिले. कविता, लघुकथा, ललित, निबंध वगरे लिहून वाचकांच्या, मित्रपरिवाराच्या शाबासक्या घेणारे हौशी लेखक सुटाबुटात टाय लावून प्रेझेंटेशनची वाहवा मिळवण्यात गर्क झाले.

अर्थात सगळ्यांच्याच नशिबी काही हे असं पिंजऱ्यातलं जिणं आलं नाही. काही भाग्यवान स्वतंत्रच राहिले आणि तगलेही. पण अशांची संख्या फारच कमी असते. आणि मग त्यांचं ते तसं मुक्त जगणं बघून हेवा वाटायला लागतो. आपल्यात जी आवड, पॅशन होती ती घेऊन तसाच बेभान जगणारा जीव पाहिला की स्वतवरच चरफडायला लागतो. आपल्याला जसं जगायचं होतं तसं कुणीतरी जगतं आहे हे पाहताना स्वतसाठी मन उदास होणं साहजिकच आहे.

कधीतरी मग वाटतं की ही सगळी बंधनं झुगारून मनाला वाट्टेल तसं जगावं. जे मनात येईल ते करावं. जिथे िहडावंसं वाटेल तिथे फेरफटका मारावा. सोन्याचा िपजरा सोडून मस्त मुक्त आसमंतात सर करावी. खोल डोहामध्ये डुबकी मारून तळ गाठावा. विचारांचं वारू सुस्साट सुटलेलं असतं. त्यानुसार मग योजना आखायला सुरुवातही होते. मनाशीच काही बेत पक्केही केले जातात. टप्प्याटप्प्याने इमले रचले जात असतात. यादी तयार होते. काय करायचं, काय नाही करायचं याचीही विभागणी होते. आणि शेवटच्या ओळीवर येऊन विचारांना ब्रेक लागतो ती म्हणजे वेळ आणि खिसा.

घडय़ाळाच्या काटय़ाला आणि पगाराच्या वाटय़ाला बांधलेले आपण मुक्त जगायचं म्हटलं तरी प्रपंचाच्या चौकटी मोडण्याचं धैर्य काही होत नाही. खरंतर मुक्तपणे जगत पॅशनच्या मागे धावताना वाहवत जायची भीती जास्त असते. कारण शेवटी पॅशन हे एक वेड असतं, नाद असतो. त्या वेडाच्या मागे कुणी गेला की मग प्रपंचाचं भुस्काट होतं. आणि ते निस्तरता येण्यासारखं नसतं. त्यापेक्षा प्रपंचाला शरण जाऊन अधूनमधून येणारे भुस्काटाचे झटके सहन करणं कधीही सोयीस्करच असतं नाही का?
पुष्कर सामंत – response.lokprabha@expressindia.com / @pushkar_samant
सौजन्य – लोकप्रभा