उपक्रम निशांत पाटील - response.lokprabha@expressindia.com प्राचीन काळी आजच्यासारखी मनोरंजनाची साधने उपलब्ध नव्हती तेव्हा फावल्या वेळात लोक विविध खेळ खेळत. त्या खेळांमधून त्या काळातली सर्जनशीलता जाणवते. प्राचीन काळी घरोघरी अनेक प्रकारचे बैठे खेळ खेळले जात. बुद्धिबळात प्रतिस्पध्र्याच्या चाली थोपवून मात देण्याचा प्रयत्न असो की ल्युडोमध्ये प्रतिस्पध्र्याची सोंगटी माघारी धाडणे असो त्यात एक वेगळीच मजा यायची. मात्र स्मार्टफोन हातात आल्यावर या खेळांचे डाव फारसे रंगताना दिसत नाहीत. याचे एक कारण अर्थातच हे खेळ पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ हे होय. स्मार्टफोनच्या काळात आपण आपले अनेक पारंपरिक खेळ विसरलो आहोत. अशाच काही जुन्या खेळांची नवीन पिढीला माहिती व्हावी आणि ते खेळता यावेत म्हणून मुंबई विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर एक्स्ट्रा म्युरल स्टडीज’ या विभागाने आणि ‘इंडिया स्टडी सेंटर ट्रस्ट’ने १६ आणि १७ जून रोजी मुंबईत ‘एन्शन्ट गेम्स वीकएन्ड’चे आयोजन केले होते. या अंतर्गत खेळांचे प्रदर्शन भरवून ते खेळण्याची संधी उपस्थितांना दिली. या प्रदर्शनात गंजिफा खेळाचा संच दिसतो, ज्यात शंख, तलवारी यांच्या चित्रांचा वापर केला आहे, तसेच या संचांवर दशावतारांचेही चित्रण असायचे. भारतीय खेळांबरोबर आपल्याला चेकर्स या युरोपीय मूळ असलेल्या खेळाचे दर्शन होते. या खेळाचे भारतीय नाव म्हणजे बंदरचाल. त्यात सोंगटय़ा तिरप्या रेषेत चालवून प्रतिस्पध्र्याच्या चालींवर मात करून पुढे जात राहणे अपेक्षित असते. यामधील काही खेळ हे सांस्कृतिकदृष्टय़ाही महत्त्वाचे आहेत. मोक्षपटम् हा जैन धर्मातून आलेला खेळ, ज्याचे आजचे रूप म्हणजे सापशिडी. साधारणपणे इसवीसन पूर्व पाचव्या शतकात उदयास आलेला हा खेळ िहदू आणि नंतर इस्लाम या दोन्ही धर्मीयांनी आपलासा केला. या खेळाचे मुख्य उद्दिष्ट खेळाडूंना पाप-पुण्याची माहिती देणे हे होते. ब्रिटिशांनी कामगारांना कामाचे महत्त्व शिकवण्यासाठी या खेळात बदल केले असे म्हणतात. पुढे धार्मिक गोष्टी मागे पडून पटावर फक्त आकडे आले आणि खेळाचा मुख्य उद्देश मागे पडला. महाभारतात कौरव आणि पांडवांनी खेळलेला द्युताचा डाव, ज्यात पांडवांचा पराभव झाला तो खेळ म्हणजे चौपर किंवा पच्चीसी. दोन्ही खेळांमध्ये फारसा फरक नाही, मात्र पच्चीसीमध्ये कवडय़ांचा वापर करतात तर चौपरमध्ये फासे वापरले जातात. हा खेळ आजच्या काळातील ल्युडो या खेळांशी साधम्र्य दाखवतो. महाभारतातील कथेनुसार शकुनीने फासे एका राक्षसाच्या हाडांपासून बनवले होते, ज्यामुळे ते त्या खेळात शकुनीच्या इच्छेप्रमाणे पडले. वाघबकरी हा डावपेच लढवण्याचा एक खेळ. ज्यात १७ बकऱ्या व तीन वाघ असतात. खेळाची सुरुवात वाघांची जागा निश्चित करून होते. त्यानंतर बकऱ्या पाटावर येतात. वाघ बकरीच्या शेजारची रिकामी जागा पाहून उडी मारू शकतात व ती बकरी बाद होते. तर बकऱ्यांचे काम म्हणजे वाघांना कोंडणे. या खेळात वाघ आणि बकरी या दोन्ही बाजूंनी जिंकल्यावरच आपण खेळ जिंकतो. तामिळनाडूमधील पलनगुडी हासुद्धा एक युक्तीचा खेळ आहे. पलन म्हणजे लाकूड आणि गुडी म्हणजे घर. यात लाकडी पेटीला खळगे बनवले जातात. ज्यात सुरुवातीला प्रत्येकी पाच बिया असतात. यात एकेक बी एकेका खळग्यात टाकत जाताना जेव्हा रिकामा खळगा येतो तेव्हा त्याच्या पुढील आणि त्याच्या बाजूच्या खळग्यातील बिया खेळाडूला मिळतात. अशा प्रकारे ज्या खेळाडूंकडे शेवटी जास्त बिया असतील तो जिंकतो. सुरुवातीला यांत्रिक आणि नशिबाचा वाटणारा हा खेळ खेळताना संभवनीयतेचा वापर होतो. कारण यात पुढचा विचार करून व्यवस्थित आखाणी करावी लागते. हा खेळ मुख्यत्वे स्त्रियांकडून खेळाला जातो. या खेळाचे मूळ आफ्रिकेमध्ये आहे असे मानले जाते. या खेळाचे वैशिष्टय़ म्हणजे हे खेळ खेळण्यासाठी फार साहित्य लागते असेही नाही. जमिनीवरही रेषा आखून अथवा खळगे करून त्यात हे खेळ खेळले जात. अष्टचम्मा खेळावर आधारित नवरा-नवरी हा एक मजेशीर खेळ आहे. अष्टचम्मा खेळात पाच बाय पाचचा पट असतो आणि सगळी घरे एका विशिष्ट पद्धतीने फिरून सोंगटी घरात आणायची असते. कवडय़ा सुलटय़ा किंवा उलटय़ा पडल्याने जी किंमत येते त्यावरून खेळाचे नाव पडले आहे. नवरा-नवरी खेळात अशी कल्पना आहे की नवरी रुसून दूर गेली आहे आणि नवरा तिची समजूत काढून तिला परत आणायला जात आहे. एकदा नवऱ्याचे प्रतीक असलेली सोंगटी आतील घरात गेली की बाहेर येताना बायकोचे प्रतीक असणारी सोंगटी असा दोघांचा मूळ स्थानी एकत्रित प्रवास सुरू होतो. इथे मात्र खेळाचे वेगळे नियम या जोडीला लागू होतात. नवरा-बायको एक झाल्यावर ते संकटांवर मात करू शकतात हे लक्षात येते. हे प्राचीन खेळ घरच्या घरी खेळता यावेत म्हणून संस्थेकडून नियमावली, तसेच खेळाचे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. आयोजकांपैकी एक असलेल्या राधा सिन्हा यांनी सांगितल्याप्रमाणे लहान मुलांसाठी शिक्षण क्षेत्रात या खेळांचा वापर होऊ शकतो. मनोरंजनाबरोबरच हे खेळ इतर लोकांशी जोडून घ्यायला मदत करतात. त्यामुळे संगणक आणि स्मार्टफोनवरील आभासी खेळांमधून वेळ काढून एकदा तरी हे खेळ खेळलेच पाहिजेत. सौजन्य - लोकप्रभा