माझे वजन खूप वाढले आहे त्यामुळे मी आता जिम लावणार , आता जिम लावली नाही तर माझे काही खरे नाही, असे म्हण अनेकजण उत्साहात व्यायामशाळेत प्रवेश घेतात. मात्र, काही दिवस उलटल्यानंतर आपल्याला नियमित व्यायामाचा कंटाळा येतो. त्यामुळे जिममध्ये नियमितपणे जाणे होत नाही. मात्र, जिम सोडल्यास वजन वाढण्याची भीती अनेकांना सतावत असते. पण यामागे नेमके काय कारण असते? खरंच वजन वाढते का? या गोष्टीचा शरीरावर काय परिणाम होतो याबाबत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दररोजच्या जिमच्या व्यायामामुळे शरीरात अनेक बदल होतात. जिमच्या व्यायामामुळे मांसपेशी तुटतात. या तुटलेल्या मांसपेशी रिपेअर करण्यासाठी चांगल्या आहाराची गरज असते. त्यामुळे जिमवरुन आल्यावर भूक लागते. यावेळी शरीराला योग्य ते पोषण मिळाले नाही तर शरीरातील उष्मांक साठून राहतात. दुसऱ्या दिवशी जिमला गेल्यावर साठून राहीलेल्या कॅलरीज जाळल्या जातात. जिमला जाणे बंद केल्यावर त्याला पर्यायी व्यायाम करणे आवश्यक आहे. मात्र, तसे न केल्याने आपण जो आहार घेतो त्यातील उष्मांक जळण्याची क्रिया बंद होते. हा उष्मांक पोटावर चरबीच्या रुपात साठून राहतो. त्यामुळे जिम सोडली तरी पर्यायी व्यायाम करत राहणे गरजेचे असते. त्यामुळे तब्येत चांगली राहण्यास मदत होते. मांसपेशींचे रुपांतर कधीच चरबीत होत नाही. त्यामुळे हा गैरसमज दूर करावा. जिमला जाणे अचानक बंद करत असाल तर खालील गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. १. जिम लावण्याआधीच त्याला पर्यायी व्यायामप्रकार नाही का ते शोधा. २. जिममध्ये जात असताना आपल्या शरीराची ताकद, लवचिकता, आपली क्षमता हे वाढत आहे की नाही ते तपासून पाहा. ३. जिम सोडल्यानंतर आहारात योग्य ते बदल करा. ४. आवश्यक तेवढी झोप घ्या. ५. श्वसनाशी निगडीत व्यायामप्रकार सुरु ठेवा. ६. आहारात फळे आणि भाज्यांचा वापर करा. मनाली मगर-कदम, फिटनेसतज्ज्ञ