सन २०३० पर्यंत मलेरियाचे निर्मूलन करण्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मलेरियावरील नवी औषधे आणि नव्या डासनाशक कीटकनाशकांची निर्मिती होणे आवश्यक आहे. त्यासाठी नवी साधने आणि संशोधनाच्या क्षेत्रात सातत्याने गुंतवणूक करणे आवश्यक आहे, असे भारतासह आशियातील अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मलेरियाबाबत नुकताच ‘मलेरिया फ्युचर्स फॉर एशिया’ हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये मलेरिया निर्मूलनातील प्रगतीविषयी भारत, कंबोडिया, म्यानमार, थायलंड आणि व्हिएतनाममधील मलेरियाविरोधी कार्यक्रमांचे संचालक, संशोधक आणि बिगरशासकीय संस्थांची मलेरिया निर्मूलनाबाबतची मते नोंदविण्यात आली आहेत. नोव्हार्टिस या कंपनीसाठी स्वतंत्र धोरण संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. याच कंपनीने दोन दशकांपूर्वी पहिली विशिष्ट मात्रेची आर्टेमिसिनिन आधारित संयुक्त उपचारपद्धती (एसीटी) आणली होती. सध्या ‘एसीटी’ ही भारतात मलेरियावरील सुवर्ण प्रमाणित उपचारपद्धती मानली जाते. जागतिक आरोग्य संघटनेने २०१८ मध्ये जाहीर केलेल्या अहवालानुसार भारतात २०१६ ते २०१७ दरम्यान मलेरियाच्या रुग्णांची संख्या ३० लाखांहून अधिक कमी झाली आहे. या अभ्यासात सहभागी झालेल्या तीनचतुर्थाश तज्ज्ञांच्या मतानुसार, भारतात मलेरियाचा सर्वात गंभीर प्रकार असलेल्या पी. फॉल्सिपेरम मलेरियाचे निर्मूलन करण्याचे लक्ष्य लवकरच गाठले जाणार आहे. असे असले तरी, बहुतांश तज्ज्ञांनी मलेरियाचा पी. व्हॅव्हॅक्स हा प्रकार २०३० पर्यंत आटोक्यात येण्याबाबत साशंकता व्यक्त केल्याचे अहवालात नमूद केलेले आहे.