हल्ली धकाधकीच्या जीवनशैलीमुळे पालक आणि मुले एकमेकांना फार कमी वेळ भेटतात. पालकांचा सर्वाधिक वेळ ऑफीस आणि इतर कामात जातो. तर मुलांचा शाळा आणि क्लासेसमध्ये. मग साप्ताहीक सुटीच्या दिवशी थोडा वेळ मिळाला तर ठीक नाहीतर तोही नाही. मुलांना पुरेसा वेळ न देण्याची खंत पालकांना अनेकदा सतावत असते, मात्र त्यातून मार्ग कसा काढावा हे त्यांना समजत नाही. पण मुलांमध्ये काही कारणांनी नैराश्याची भआवना असेल तर पालकांनी त्यांच्याशी साधलेला संवाद मुलांना या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी उपयुक्त ठरतो.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात हे पुन्हा एकदा सिद्ध करण्यात आले आहे. लहान मुलांना येणारे नैराश्य या पालक आणि मुलांच्या संवादातून दूर होण्यास मदत होऊ शकतो. ३ वर्षाच्या आसपास वय असणाऱ्या मुलांमध्ये अशाप्रकारचे नैराश्य प्रामुख्याने पहायला मिळते. त्यावेळी त्यांना मानसिक उपचारांची आवश्यकता असते हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. यामध्ये ‘पालक-मुले संवाद उपचारपद्धती’ देणे उपयुक्त ठरते. त्याच्या काही पद्धती आहेत त्या पद्धती पालकांनी तज्ज्ञांकडून वेळीच शिकून घ्यायला हव्यात. या पद्धतींचा वापर करुन पालक आपल्या मुलांना नैराश्यातून योग्य पद्धतीने बाहेर काढू शकतात.

अमेरिकेतील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेंटल हेल्थचे उपसंचालक जोएल शेरील म्हणाले, या पद्धती अतिशय विचारपूर्वक आणि योग्य अभ्यास करुन तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याचा मुलांमधील नैराश्य दूर होण्यासाठी निश्चितच उपयोग होऊ शकेल. या पद्धती जगभरात कुठेही वापरल्या जाऊ शकतात. निराशेदरम्यान मुलांमध्ये असणारी लक्षणे आणि पालकांनी त्यांच्यावर उपचारपद्धतींचा वापर केल्यानंतर काही मुलांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यावरुनच या उपचारपद्धती उपयुक्त ठरत असल्याचे निश्चित करण्यात आले.