मार्च महिना संपत आला की उन्हाळी शिबिरांचे वारे वाहू लागते. शिबिरे घेणाऱ्यांची आणि पालकांची धांदल उडते. मुलांचा सुटीचा वेळ सत्कारणी लागावा आणि त्यातून त्यांचे मनोरंजनही व्हावे हाच या शिबिरांचा मुख्य उद्देश असतो. विविध माध्यमांतून येणाऱ्या या शिबिरांच्या जाहिराती जास्तीत जास्त आकर्षक होतील याचे प्रयत्न केले जातात. विशेष म्हणजे एकावर एक फ्री मिळणाऱ्या कपड्यांप्रमाणे एकावेळी इतक्या मुलांनी प्रवेश घेतल्यास अमुक-अमुक सूट अशा सवलीतीही जाहीर केल्या जातात. यामध्ये अगदी कलाकुसरीच्या वर्गापासून ते मुलांना स्वयंपाकघरातील लहानसहान कामे शिकवणारी शिबिरेही घेतली जातात. वर्षभर मुले शाळा, अभ्यास आणि क्लासेस करुन कंटाळत असल्याने त्यांना साहसी शिबिरांनाही घातले जाते. अनेक शाळा, क्लासेसकडूनही या शिबिरांचे आयोजन केले जाते. मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी ही शिबिरे हातभार लावत असली तरीही त्यांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न अनेक वर्षांपासून कायम आहे. नुकत्याच पुण्यातील मुळशी येथे झालेल्या अपघातानंतर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चेन्नईतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील काही विद्यार्थी अशाचप्रकारच्या एका साहसी शिबिरासाठी पुण्यात आले असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. पोहण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. मुळशीतील एका सामाजिक संस्थेतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आता अशाप्रकारे आपल्या पाल्याला शिबिरात घालण्यापूर्वी पालकांनी कोणती काळजी घ्यायला हवी पाहूयात. - शिबिरादरम्यान मुलांना शहराबाहेर घेऊन जाणार असतील, तर त्याठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेची पुरेशी खात्री करून घ्या. - साहसी खेळांचे शिबिर असेल तर त्यामध्ये कशाप्रकारे सुरक्षाव्यवस्था आहे याची खात्री करुन घ्या. - शिबिर आयोजित करणारी संस्था, त्यातील प्रशिक्षक, प्रमुख यांच्याबाबतची योग्य ती माहिती आपल्याला असायला हवी. - सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शिबिरांच्या जाहिराती येतात. मात्र त्याला बळी न पडता योग्य ती खातरजमा केल्याशिवाय मुलांना अशा शिबिरामध्ये घालू नका. - शिबिराचा भौगोलिक परिसर, शिबिराला येणारी इतर मुले, शिबिरातील नेमक्या अॅक्टीव्हिटीज यांची पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. - मूल शिबिरात गेलेले असताना त्याच्या संपर्कात राहा. तेथील गोष्टी त्याला आवडत आहेत ना, जमत आहेत ना याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करा.